पनवेल: मुंबई गोवा महामार्गावरील पहिल्या टप्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वरील पनवेल ते कासू हा ४२ किलोमीटरचा महामार्ग कॉंक्रीटीकरणाच्या कामाला गुरुवारपासून सूरुवात होत आहे. केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते या कामाचे गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता खारपाडा टोलप्लाझा येथे भूमिपुजनाचा कार्यक्रम होणार आहे. याचवेळी केंद्रीयमंत्री गडकरी यांच्या हस्ते राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ राजेवाडी फाटा ते वरंधगाव या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाच्या दुपदरीकरणाचे काम सूरु होणार आहे.
कोकणात जाणा-या मुंबई गोवा महामार्गावरील डांबरी रस्त्याची समस्या कायमची संपविण्यासाठी केंद्रीयमंत्री गडकरी यांनी कॉंक्रीटीकरणाच्या मार्गाचा पर्याय प्रत्यक्षात अंमलात येत आहे. मुंबई गोवा महामार्गाचा पनवेल ते इंदापूर हे अंतर ८४ किलोमीटर आहे. कोकणात सर्वाधिक पाऊस कोसळत असल्याने डांबरी रस्त्यांची दुरावस्था होत असून सरकारचे कोट्यावधी रुपये यामध्ये वाया गेले आहेत. तसेच दुर्दशा झालेल्या महामार्गावरील खड्यांमुळे अपघातांचे सत्र या महामार्गावर सूरुच असते.. मुंबई गोवा महामार्ग जिवघेणा बनल्याने या महामार्गाचे कॉंक्रीटीकरणासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली आहेत. मुंबई गोवा महामार्गाचे १४ मीटर रुंदीचा कॉंक्रीटीकरण करण्याचा प्रस्ताव राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सूचविल्यानंतर केंद्रीयमंत्री गडकरी यांनी त्या प्रस्तावास मान्यता दिली. अधिक तातडीने हे काम करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने या कामाचे दोन वेगवेगळ्या टप्यात विभाजन केले. यातील पहिला ४२ किलोमीटरच्या पल्याचे काम कासू ते इंदापूर या दरम्यान कल्याण टोलेवज कंपनीला ३३३ कोटी रुपयांना देण्यात आले.
हेही वाचा >>>नवी मुंबईकरांवर पाणी कपातीचे संकट? मोरबे धरणात १५ ऑगस्टपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा
सध्या या कामाची निविदा प्रक्रीया पुर्ण झाल्यावर कंत्राटदार कंपनीला मोबीलीटीची (गतिशीलता) आगाऊ रक्कम संबंधित कंपनीने घेऊन सध्या महामार्गावर कामासाठी लागणारी साधणे आणली जात आहे. हे काम कल्याण टोलवेज कंपनीला २१ मे २०२४ पर्यंत पुर्ण करण्याची मुदत देण्यात आली आहे. तसेच गुरुवारी होत असलेल्या भूमिपूजनाचे काम पनवेल येथील जे. एम. म्हात्रे इन्फ्रा प्रा. लीमीटेड या कंपनीला देण्यात आले आहे. हे काम २५१ कोटी रुपयांचे असून पनवेल ते कासू या ४२ किलोमीटरच्या पल्यावर १४ मीटर रुंदीचा कॉंक्रीटचा महामार्गाचे बांधकाम केले जाणार आहे. हे दोन्ही महामार्गांवर चार मार्गिका असणार आहेत. जे. एम. म्हात्रे इन्फ्रा कंपनीला पुढील ९ महिन्यात हे काम पुर्ण करण्याचे आव्हान असणार आहे. गुरुवारच्या भूमिपुजनाच्या सोहळ्यासाठी राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, राज्यसभेचे सदस्य खासदार कुमार केतकर, लोकसभा सदस्य श्रीरंग बारणे, लोकसभा सदस्य सुनील तटकरे, विधानपरिषद सदस्य जयंत पाटील, निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, ज्ञानेश्वर म्हात्रे, विधानसभा सदस्य भरत गोगावले, प्रशांत ठाकूर, रविंद्र पाटील, आदिती तटकरे, महेंद्र थोरवे, महेश बालदी, महेंद्र दळवी हे उपस्थिती राहणार आहेत.