नवी मुंबई : काही दिवसांपूर्वी आगामी नवी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग निहाय जाहीर करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी शनिवारी अंतिम करण्यात आली आहे. यात प्रारूप यादीच जाहीर केलेली ८,४५,५२४ मतदार संख्या कायम ठेवण्यात आली आहे. ४१ प्रभागांपैकी प्रभाग क्रमांक १ व २१ हे २ प्रभाग वगळता इतर ३९ प्रभागांतील मतदारांची संख्या बदलली आहे. एकीकडे निवडणूक प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. मात्र सत्ताबदल झाल्याने निवडणूक एक सदस्यीय पद्धतीने होणार की बहु सदस्यीय पद्धतीने या बाबत साशंकता व्यक्त होत आहे. नवीन सरकारने सरपंच व नगराध्यक्ष निवड थेट जनतेतून हे पूर्वीचे निर्णय पुन्हा लागू केल्याने आता पालिका निवडणुकीबाबत सरकार काय निर्णय घेणार याकडे इच्छुकांसह प्रशासनाचे लक्ष लागून आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार नवी मुंबई महापालिका प्रशासनाने प्रभाग निहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध केली होती. त्यावर हरकती घेण्यासाठी १ जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली होती. नंतर मुदतवाढ देत ३ जुलैपर्यंत हरकती घेण्यात आल्या. त्यानुसार १८४२ हरकती घेण्यात आल्या होत्या. नियमानुसार हरकतींवर सुनावणी घेतली जात नाही. मात्र हरकतीनुसार स्थळपाहणी पालिकेमार्फत करण्यात आली व त्यानुसार पालिकेने दुरुस्ती करून अहवाल निवडणूक आयोगाला पाठवला होता. त्यानंतर शनिवारी पालिकेने अतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या आहेत. त्यानुसार बहुतांश प्रभागात मतदारसंख्या बदलली आहे. मात्र एकूण मतदार संख्या कायम आहे. सरकारच्या निर्णयाकडे लक्ष नवीन सरकारने जर एक सदस्यीय पद्धतीने निवडणुका घेण्याचे जाहीर केले तर आतापर्यंत केलेली सर्व प्रशासकीय प्रक्रिया पुन्हा नव्याने करावी लागणार आहे. तसेच गेली दोन वर्षे चार वेळा निवडणुकीची तयारी इच्छुकांनी केली आहे. यात त्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. आता पुन्हा बदल झाल्यास त्याचीही अडचण होणार आहे. त्यामुळे प्रशासन व राजकीय पक्षांचे शासनाच्या निर्णयाकडे लक्ष लागून आहे. नवी मुंबई महापालिका प्रशासनाने वेळोवेळी राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही केली आहे. आता प्रभाग निहाय मतदार याद्याही अंतिम करण्यात आल्या आहेत. पण निवडणूक कोणत्या पध्दतीने होणार यावरच सर्व अवलंबून राहणार आहे. त्यामुळे आता शासन व निवडणूक आयोग ज्या पध्दतीने आदेश देतील त्याप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल. -अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका कायदा बासनात गुंडाळून नवीन सरकार स्थापन झाले आहे. लोकांसमोर जायला घाबरत असल्याने निवडणूक पध्दतीत बदल करीत वेळकाढूपणा करीत आहेत. गेली दोन वर्षांहून अधिक काळ पालिकेत प्रशासकीय राजवट आहे. त्यामुळे सरकारने निवडणूक घेण्याबाबत व त्याच्या पध्दतीबाबत तत्काळ निर्णय घ्यायला हवा. - विठ्ठल मोरे, शिवसेना जिल्हाध्यक्ष, बेलापूर मतदारसंघ