उरण : वाढते वादळी वारे व हवामानातील बदलांमुळे मासेमारी बोटी रिकाम्या परतू लागल्याने मासळीची आवक घटली आहे. यामुळे मासळीच्या घाऊक आणि किरकोळ दरात २५ ते ३० टक्क्यांची वाढ झाली आहे. सध्या अनेक कारणांनी भाज्यांचे दर वाढले असताना मासळीच्या दरानेही उसळी घेतल्याने सर्वसामान्यांचे मासिक बजेट कोलमडू लागले आहे.

उरण तालुक्यातील किनारपट्टीवरील करंजा, मोरा, दिघोडे, आवरे परिसरात मोठ्या प्रमाणात खोल समुद्रातील मासेमारी करण्यात येत आहे. करंजामध्ये नव्याने सुरू झालेल्या ‘करंजा – द्रोणागिरी मत्स्य व्यवसाय बंदर’ येथे अनेक व्यापारी आणि स्थानिक रहिवासी हे घाऊक आणि दैनंदिन गरजेसाठी आवश्यक मासळी खरेदी करू लागले आहेत. यामध्ये सायंकाळच्या सुमारास भरणाऱ्या बाजारामध्ये छोट्या करंदीपासून कोलंबी, पापलेट, सुरमई, रावस, कलेट, हलवा, कुपा, बोंबील असे सुमारे ३० ते ४० प्रकारचे अनेक मासे विक्रीसाठी दिसून येत आहेत.

तर करंजा येथील या बंदरात १०० रुपयांपासून १२०० रुपये किलोच्या दराने मासळी विक्री करण्यात येत आहे. तर करंजा बाजारात बला, वाम, पाला, माखली, मांदेली, ढोमी, पाकट, शिंगाला, चिंबोरी असे मासेदेखील विक्रीसाठी असल्याचे दिसून आले आहे. तर या मासळी बाजारात सुरमई, कोलंबी, कुपा, पापलेट, कलेट यांना अधिक मागणी आहे. यात पापलेट, सुरमई, हलवा आणि कोळंबी यासह अनेक चविष्ट माशांचे प्रकार कमी प्रमाणात मिळत असल्याने किलोमागे या माशांचे दर अधिक वाढले आहेत.

खवय्यांच्या आवडीला मुरड

रायगडच्या खोल समुद्रातील चविष्ट म्हावरे, सुरमई, पापलेट म्हणजे खवय्यांचा जीव की प्राण! पण सध्या म्हावरे कडाडल्याने खवय्यांना आपल्या खाण्याला मुरड घालावी लागत आहे. त्याचप्रमाणे खिशाला चाट बसत आहे. या एका पापलेटच्या नगासाठी १ हजार २०० ते १४०० रुपये मोजावे लागत आहेत. तर अधिक मागणी असलेल्या सुरमईसाठी १ हजार, कोळंबी ५०० तर हलवा ५५० वर जाऊन पोहोचला आहे. सागरी किनाऱ्यावरील हजारो बोटी बंदरात नांगरून ठेवण्यात आल्या आहेत. सततच्या बदलत्या हवामानामुळे मासळीची आवक घटली आहे. परिणामी भाव चांगलेच कडाडले आहेत.

स्थानिक मासळीचे प्रमाण कमी

येथील खाडीकिनाऱ्यावर आणि चिखलात निवटे, खरब्या खुबे, माकोल, कोळीम, ताजी कोलंबी आदी प्रकारचे मासळीचे प्रमाण मोठे होते. यापैकी अनेक प्रकारची मासळी ही हंगामी असली तरी मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत होती. स्थानिक मासळीचे प्रमाण कमी झाल्याने मासळीच्या दरात प्रचंड वाढ झाली असून परंपरागत खाद्य असलेल्या मासळीला अधिकचे पैसे मोजावे लागत असल्याची माहिती स्थानिक सत्यजित पाटील यांनी दिली आहे.

अचानकपणे वादळी वारे सुटल्याने करंजा आणि परिसरातील शेकडो मासेमारी बोटी मासळीविना परतल्या आहेत. त्यामुळे प्रत्येक बोटीचे आठ ते दहा लाखांचे नुकसान झाले आहे. बोटी रिकाम्या परतल्याने गेल्या दहा दिवसांत मासळीच्या दरात २५ ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. यात लवकरच सुधारणा होऊन मासळीचे दर कमी होणार आहेत.रमेश नाखवा, माजी उपाध्यक्ष, करंजा सहकारी संस्था

मासळीचे दर असे

पापलेट १३०० ते १४००

सुरमई ८५० ते १०००

कोळंबी ४५० ते ५००

रिबनफिश १७५ ते २००

हलवा ५०० ते ५५०

माकुळ ५५० ते ६००

रावस ६५० ते ७००

जिताडा १२००

बांगडा १२० ते १५०