दैनंदिन रुग्ण दोन हजारांपेक्षा अधिक, चाचण्या १४ हजारांवर नवी मुंबई : गुरुवारचा दिवस करोनाकाळातील सर्वोच्च दैनंदिन रुग्णांची नोंद करणारा ठरला. करोनाच्या दुसऱ्या लाटेत ४ एप्रिल २०२१ रोजी १४४१ इतकी रुग्णसंख्या होती. गुरुवारी दोन हजारांच्या पुढे दैनंदिन रुग्ण शहरात सापडले आहेत. त्यामुळे शहरातील उपचाराधीन रुग्णांची संख्या पाच हजारांपेक्षा अधिक झाली आहे. शहरात करोना रुग्णांचा गुणाकार सुरू असून रुग्णसंख्येचा विस्फोट होत असल्याने पालिका प्रशासनही हादरले आहे. पुढील काळातील सर्व आंदाज आता फोल ठरू लागल्याने आरोग्य सुवधांत वाढ करावी लागण्याची शक्यता असून मनुष्यबळाचा तुटवडाही भासणार आहे. त्यामुळे प्रशासनाने सोळाशेपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी भरती प्रक्रीया राबवण्यास सुरुवात केली आहे. यात एकच दिलासा म्हणजे दुसऱ्या लाटेत तीव्र लक्षणे असलेले रुग्ण असल्याने प्राणवायू व जीवरक्षक प्रणालीची मोठी गरज निर्माण झाली होती. त्यामुळे प्रत्यक्षात उपचार घेणारे रुग्ण अधिक होते. तसेच साध्या खाटांवर असलेल्या रुग्णाला किंवा घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णाला ऐनवेळी प्राणवायू व जीवरक्षक प्रणालीची गरज भासत होती. त्यामुळे मोठे संकट निर्माण झाले होते. या वेळी बहुतांश रुग्ण हे लक्षणविरहित आहेत. गेल्या महिन्यात ६ डिसेंबरला शहरातील दैनंदिन रुग्णसंख्या फक्त २३ होती. ती २८ डिसेंबर रोजी ८३ इतकी होत उपचाराधीन रुग्ण हे ५६० इतके झाले होते. गेल्या दहा दिवसांत ६६६२ रुग्णांची भर पडली आहे. गुरुवारी दैनंदिन नवे रुग्ण २१५१ इतके सापडले असून उपचाराधीन रुग्णांची संख्या ६७५८ पर्यंत गेली आहे. गेल्या दहा दिवसांपासून शहरात दैनंदिन रुग्णांचा गुणाकार सुरू आहे. महिनाभरातच शहरातील करोनाची स्थिती बदलली असून दैनंदिन रुग्णसंख्या एका दिवसाला २ हजार रुग्णांच्या वर गेली आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने करोना चाचण्यांची संख्याही वाढवली असून दिवसाला १५ हजार करोना चाचण्या करण्यात येत आहेत. करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असून पालिकेने पुन्हा एकदा सर्व यंत्रणा कार्यरत केली असून पालिका प्रशासनावर आरोग्यसेवेचा प्रचंड ताण येऊ लागला आहे. आगामी काळात उपचाराधीन रुग्णांची संख्या २५ हजारांच्या घरात जाण्याची शक्यता पालिका प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे पालिकेने एकीकडे रुग्णशय्या वाढवल्या जात असून अतिरक्त करोनायोध्यांचीही पालिकेला आवश्यकता आहे. लक्षणेविरहित रुग्ण करोनाचे वाहक ठरत आहेत. त्यामुळे चाचण्यांवर भर दिला आहे. पोलीस बाधित नवी मुंबई : नवी मुंबई पोलीस दलात आतापर्यंत ४० जण करोनाबाधित झाले असून यात ११ अधिकारी व अन्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. करोनाच्या पहिल्या लाटेत ११ पोलिसांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पोलिसांनी विशेष काळजीवाहू पथक स्थापन केले होते. त्यामुळे दुसऱ्या लाटेत पोलीस बाधित झाले मात्र मृत्यूच्या घटना घडल्या नाहीत. आता करोनाचे पुन्हा रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. यात आतापर्यंत ४० पोलीस कर्मचारी बाधित झाले आहेत. घरीच विलगीकरण करण्यात आले असून प्रकृतीत सुधारणा आहे, अशी माहिती पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी दिली आहे. नवी मुंबई शहरात दैनंदिन रुग्णसंख्या व उपचाराधीन रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. आगामी काळात ही संख्या कुठपर्यंत जाईल याचा अंदाज नाही. शहरातील टास्क फोर्सबाबत विचारविनिमय करण्यात येत असून त्याचेही अंदाज व निरीक्षण यांच्यावरून आरोग्य सुविधा, उपचार यामध्ये योग्य बदल करण्यात येणार आहे. - अभिजीत बांगर, आयुक्त