नवी मुंबई : एपीएमसी बाजारपेठ, किरकोळ बाजारपेठ, रेल्वे स्थानके, आठवडी बाजार, धार्मिक स्थळे, मद्यालय, बस स्थानके, मॉल, दुकाने यासारख्या गर्दीच्या ठिकाणी राज्य शासनाने घालून दिलेले नियम धाब्यावर बसविण्याचे सर्रास प्रकार सुरू आहेत. दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी फारशी गांभीर्याने घेतलेली नाही. त्यामुळे दिवसा गर्दी आणि रात्री मुक्तसंचार सुरूच आहे. त्यामुळे पालिकेने केलेल्या रुग्णांच्या चाचणीपेक्षा रुग्णसंख्या चार पट असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शहरातील खासगी रुग्णालये व दवाखाने सर्दी, खोकल आणि ताप या तक्रारीने फुलून गेले आहेत. डॉक्टरही लांबूनच तपासून या आजारावरील औषधे देत असल्याचे चित्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने रुग्णांच्या संर्पकात आलेल्या सहव्याधी व्यतिरिक्त नागरिकांनी चाचणी करू नये असे जाहीर केल्याने छुपे रुग्णांची संख्या जास्त असल्याचे पालिकेच्या डॉक्टरांनी सांगितले. राज्यात करोना रुग्ण वाढू लागल्याने नवी मुंबई पालिकनेही काही कडक उपाययोजना आखलेल्या आहेत. यात २५ पेक्षा जास्त रुग्ण एकाच इमारतीत किंवा भागात आढळून आल्यास ती इमारत क्षेत्र प्रतिबंधित करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. पालिकेने या साथीच्या पार्श्वभूमीवर करोना चाचण्यांची संख्या वाढवली असून ती दिवसागणिक १५ हजार चाचण्यांपर्यंत आहे. मात्र चाचण्या न केलेल्या पण करोना असण्याची शक्यता असलेल्या रुग्णांची सख्या जास्त आहे. चाचणी म्हणजे करोना अशी एक समजूत प्रसरत चालल्याने चाचणीपासून पळणाऱ्यांची संख्यादेखील लक्षणीय आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रात सध्या दोन हजार रुग्ण आढळून येत असले तरी ही संख्या सात ते आठ हजार रुग्णांची असण्याची शक्यता आहे. त्यात केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सहव्याधी अथवा ज्येष्ठ नागरिक वगळता करोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांनी चाचणी न करण्याच्या सूचना केलेल्या आहेत. त्यामुळे करोना असून शहरभर फिरणाऱ्यांचे फावले आहे. शहरात खासगी दवाखाने रुग्णांनी फुलून गेले आहेत. सर्दी, खोकला, ताप या आजारांवर उपचार घेत आहेत.