सोमवारी ११४१ रुग्ण; दैनंदिन रुग्ण कमी होत असल्याचा प्रशासनाचा दावा नवी मुंबई : महिनाभरात शहरातील करोनाची परिस्थिती बदलून दैनंदिन रुग्ण अडीच हजारांपार झाले होते. त्यामुळे शहरात करोनाबाधितांचा आकडा २० हजारांपर्यंत जाण्याची शक्यता होती. मात्र गेला आठवडाभर शहरातील रुग्णवाढीचा आलेख स्थिरावत आहे. सोमवारी शहरात ११४१ रुग्ण सापडले आहेत. तर रुग्ण कमी होत असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ात नवी मुंबई शहरात प्रचंड वेगाने नवे रुग्ण सापडू लागले. त्यामुळे उपचाराधीन रुग्णही त्या पटीने वाढले. त्यामुळे शहरात भीतीचे वातावरण होते. महिनाभरातच शहरातील करोनाची स्थिती बदलत दैनंदिन रुग्णसंख्या एका दिवसाला अडीच हजारापर्यंत गेली होती. १० जानेवारीला एका दिवसातील नवे रुग्ण २५२० इतके होते. ही करोनाकाळातील सर्वाधिक दैनंदिन रुग्णसंख्या नोंदवली गेली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून नवे रुग्ण २ हजाराच्या आत सापडत आहेत. हा करोनाच्या तिसऱ्या लाटेतला उतरता आलेख सुरू झाल्याचा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे. ही संख्या हळूहळू कमी कमी होईल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे. शहरातील रुग्णवाढ स्थिरावल्याचे दिसत आहे. ही शहरासाठी मोठी दिलासादायक गोष्ट आहे. करोनामुक्त होणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पालिका सर्व बदलत्या परिस्थितीवर बारीक लक्ष ठेवून असल्याचे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. उपचाराधीन रुग्णांतही घट पहिल्या व दुसऱ्या करोनाच्या लाटेमध्ये करोनाची लक्षणे असलेल्यांची संख्या अधिक होती. परंतू आता लक्षणेविरहित रुग्ण आढळून येत असून पहिल्या दोन लाटेत १० दिवस रुग्णालयात राहणे बंधनकारक होते. हा नियम बदलून सात दिवसात घरी सोडण्यात येत असल्याने उपचाराधीन रुग्णही कमी होत आहेत. त्यामुळे खाटांचा तुटवडा जाणवत नाही. खाटा रिकाम्या नवी मुंबईत महिनाभरात उपचाराधीन रुग्णांची संख्या १८ हजारांपर्यंत गेल्याने आरोग्य व्यवस्था तोकडी पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र गेले आठवडाभर रुग्णसंख्येत होत असलेली घट पाहता पालिका प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.