शीव पनवेल महामार्गावर पालिका नवीन पथदिवे एलइडी लावण्याचे काम करत असून शहरातील महत्वाच्या वेगवान अश्या नवी मुंबईतील पामबीच मार्गावरील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्या अंधारात गाडी चालवताना जरा जपूनच जावे अशी स्थिती निर्माण झाली आहे.त्यामुळे या वेगवान मार्गावर अपघाताची शक्यता वर्तविण्यात येत असून लवकरात लवकर दिवाबत्ती सुरळीत करण्याची अपेक्षा वाहनचालक करत आहे.

नवी मुंबईत राणीचा रत्नहार समजलेल्या पामबीच मार्गावर मोठ्या प्रमाणात सातत्याने वाहनांची ये जा सुरु असते. एकीकडे मोठ्या प्रमाणात वापर होणाऱ्या मार्गावर सारसोळे जंक्शन ते मोराज सर्कल तसेच वजराणी चौक ते नेरुळ या पामबीच मार्गाच्या पट्ट्यात हा मार्ग अंधारात असतो.त्यामुळे अपघाताची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.रात्रीच्या दुचाकीस्वार वेगात या मार्गावर गाड्या चालवतात.त्याहून अधिक वेगाने चारचाकी वाहने भरधाव वेगाने धावतात.परंतू या मार्गावर असलेल्या अंधारामुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे.मागील अनेक दिवसापासून मार्गावरील पथदिवे बंद चालू असतात असे चित्र आहे.

हेही वाचा : ‘इंडियन स्वच्छता लीग’ प्रभात फेरीच्या माध्यमातून पनवेलकरांमध्ये स्वच्छतेसाठी जनजागृती

पामबीच मार्गावर सारसोळे ते वजराणी चौक या भागात बऱ्याच वेळा पथदिवे बंद असतात. त्यामुळे वाहन चालवताना अडचण येते त्यामुळे पालिकेने तात्काळ या मार्गावर रात्रीच्या वेळी अंखंडीत वीजपुरवठा करावा. – दिनेश शहा ,वाहनचालक

पामबीच मार्गावरील दिवाबत्तीबाबत तात्काळ पाहणी करून पथदिव्यांची दुरुस्ती करण्यात येतील. वीजपुरवठा खंडीत होणार नाही याची खबरदारी घेऊन काम करण्यात येईल. – सुनील लाड,कार्यकारी अभियंता,परिमंडल १