उरण : दडी मारलेल्या पावसाने रविवारपासून उरण तालुक्यात रिमझिम बरसण्यास सुरुवात केली असून त्यामुळे पेरणी केलेल्या भाताच्या रोपांना हवेतील वातावरण व पावसाचे पाणी पोषक ठरणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. मात्र जेएनपीटी बंदराच्या परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहिल्याने त्याचा त्रास हा वाहनचालकांना, नागरिकांना सहन करावा लागत आहे. या वर्षी पावसाने जून महिन्याच्या सुरुवातीला भात शेतीत पेरणी केलेले भात बियाणे वाया जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांना सतावत होती. त्यात रविवारी उरण तालुक्यात रात्रीच्या सुमारास रिमझिम पावसाने सुरुवात केली. त्यामुळे हवेतील वातावरण व पावसाचे पाणी हे भात शेतीला पोषक ठरणार आहे. एकंदरीत पेरणी केलेल्या भाताच्या रोपांची जलद गतीने वाढ होणार असल्याने शेतकरी सुखावला आहे. पावसाने रविवार व सोमवार या दिवसात रिमझिम का होईना सुरुवात केल्याने शेतकरी, विद्यार्थी व पालकांनी बाजारात जाऊन छत्री, प्लास्टिक ताडपत्री, खते, कीडनाशके खरेदी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे व्यापारी वर्ग सुखावला आहे .मात्र रिमझिम पावसातही जेएनपीटी बंदराच्या परिसरातील रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहिल्याने प्रवासी नागरिकांनी, वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.