नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आवक कमी होऊनही दरात घसरण झाली आहे. सध्या सुरू असलेला रमजान तसेच उन्हाळी सुट्टी लागल्याने कमी झालेले ग्राहक यामुळे घाऊक बाजारात शेतमालाला उठाव नाही. त्यामुळे ३० ते ३५ टक्के शेतमाल बाजारात शिल्लक राहत असल्याने दरात ३० ते ४० टक्के इतकी घसरण झाली आहे. गुरुवारी भाजी बाजारात ४७० गाडय़ा आवक झाली.भेंडी, गवार, फ्लॉवर, हिरवी मिरची, शिमला मिरची या भाज्यांच्या घाऊक तसेच किरकोळ बाजारात मोठी दरवाढ झालेली होती. आता भाज्यांची आवक कमी होत असून दरात घसरण झाली आहे, अशी माहिती भाजीपाला व्यापाऱ्यांनी दिली.उन्हाळय़ाची सुट्टी असल्याने बाजारात ग्राहक येत असून त्यांची मागणीही कमी आहे. त्यामुळे शेतमालाला हवा तसा उठाव नाही. कमी आवक होऊनही ३० ते ३५ शेतमाल शिल्लक राहत आहे. रमजान सुरू असल्यानेदेखील भाजीपाला विक्रीवर परिणाम झालेला दिसत आहे. त्यामुळे भाज्यांचे दर घसरले आहेत.सध्या बाजारात काकडी, शिमला मिरची, पडवळ, हिरवी मिरची, टोमॅटो यांची आवक जास्त होत आहे, तर काकडी १२ रुपये, शिमला १६ ते १८ रुपये, पडवळ २६ रुपये, भेंडी १६ रुपयांवर विक्री होत आहे.