पनवेल – मुख्यमंत्र्यांकडून अजित पवारांच्या कार्यपद्धतीच्या आठवणींना उजाळा देत देशातील पहिल्या वकिल प्रशिक्षण व संशोधन अकादमीचे उद्घाटन पनवेल तालुक्यातील तळोजा औद्योगिक क्षेत्रात पार पडले. सार्वजनिक प्रकल्पांमध्ये गुणवत्ता, शिस्त आणि वेळेचे काटेकोर नियोजन जपणाऱ्या उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या कार्यशैलीची आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी उपस्थितांना करून दिली.

देशात प्रथमच वकिलांसाठी उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण व संशोधन केंद्र (अकादमी)चे उद्घाटन शनिवारी दुपारी तळोजा येथे देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी नुकत्याच अपघातात निधन पावलेल्या अजित पवार यांच्या कार्यपद्धतीचा विशेष उल्लेख करत, सरकारी इमारतींच्या बांधकामात ते स्वतः सकाळी लवकर प्रत्यक्ष पाहणी करून दर्जा तपासत असत, असे सांगितले. अजित पवार यांच्या निधनानंतरचा हा राज्यातील पहिला सार्वजनिक कार्यक्रम असल्याने वातावरण भावनिक होते.

या उद्घाटन सोहळ्यास सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधिश भूषण गवई, मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश चंद्रशेखर, मेघालय उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश रेवती मोहिते – ढेरे यांच्यासह विविध न्यायमूर्ती आणि राज्यभरातील बार असोसिएशनचे प्रतिनिधी उपस्थित होते. सुमारे वर्षभरापूर्वी या केंद्राचे भूमिपूजन झाले होते.

या अकादमीच्या माध्यमातून वकिलांना प्रत्यक्ष प्रॅक्टिसपूर्वी न्यायालयीन कार्यपद्धती, व्यावसायिक आचारसंहिता, नव्या कायद्यांचे अद्ययावत ज्ञान तसेच देशभरातील महत्त्वाच्या न्यायनिर्णयांचे मार्गदर्शन दिले जाणार आहे. वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाच्या पार्श्वभूमीवर एआयचा वापर करून कायदेशीर प्रक्रिया अधिक सक्षम कशा करता येतील, यावरही येथे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

अकादमीत अत्याधुनिक सुविधा असलेल्या दोन वर्गखोल्या, २५० वकिलांची क्षमता असलेले सभागृह उभारण्यात आले आहे. पुढील आठ महिन्यांत निवासी सुविधा उपलब्ध होणार असून ७५० प्रशिक्षणार्थी बसू शकतील असे दुसरे सभागृह व एम्पी थिएटर उभारण्याचे नियोजन आहे. पुढील विस्तारासाठी राज्य सरकारकडून १० कोटी रुपयांचे अतिरिक्त अनुदान देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. गुणवत्तापूर्ण कामासाठी त्यांनी अकादमीच्या बांधकामाचे विशेष कौतुक केले.