४० लिटर पाण्याच्या टाकीसह आग नियंत्रक कर्मचारी; चिंचोळय़ा गल्ल्यांमध्ये उपयुक्त

नवी मुंबई : निर्णायक क्षणी आगीच्या ठिकाणी पोहचता आले तर आगीवर नियंत्रण मिळविण्यात येऊन यश मिळू शकते. यासाठी नवी मुंबई अग्निशमन दलात आता ‘फायर बाइक’ दाखल झाल्या आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर पाच वाहने घेण्यात आली

असून गरजेनुसार त्यात वाढ करण्यात येणार आहे. ४० लिटर पाण्याची टाकी,  एक चालक व एक आग नियंत्रक कर्मचारी या वाहनावर आगीच्या ठिकाणी तत्काळ पोहचू शकतो.

आगीची घटना घडल्यानंतर सुरुवातीची वेळ अत्यंत महत्त्वाची असते. या वेळेत आगीवर नियंत्रण मिळवले नाही तर आग रौद्र रूप धारण करीत प्रचंड हानी होते, अनेकदा जीवही जातात. नेमक्या याच वेळेत आगीवर नियंत्रण येणे आवश्यक असते. मात्र शहरांतील वाहतूक कोंडीमुळे अग्निशमन वाहने दुर्घटनेच्या ठिकाणी वेळेत पोहचत नाहीत.

यावर उपाय म्हणून नवी मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाचे ‘फायर बाइक घेतल्या आहेत. प्रायोगिक तत्त्वावर पाच वाहने घेतली आहेत. निर्णायक क्षणी घटनास्थळी पोहचणे आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे काम ही वाहने करणार आहेत. तसेच अरुंद भागात आग लागल्यास ही वाहने घटनास्थळी पोहचू शकणार आहेत. खास करून गावठाण, झोपडपट्टी भागात आगीच्या घटना घडल्यास या वाहनांची मोठी मदत होणार आहे. 

२० मीटरवरील आग विझवणे शक्य

‘रॉयल एनफिल्ड’ कंपनीच्या या दुचाकी असून त्यांची नोंदणी ‘फायर बाइक’ म्हणून करण्यात आली आहे. अग्निशमन वाहनांप्रमाणे या दुचाकींना भोंगा असून सोबत चाळीस लिटर पाणी वहन क्षमता असलेली टाकी बसवण्यात आलेली आहे. ही दुचाकी २० मीटर लांब राहून आग विझवू शकतात.

सुमारे १० लाखांच्या या दुचाकी असून अत्यंत उपयुक्त आहेत. आगामी काळात लवकरच प्रत्येक केंद्रावर किमान दोन अशी वाहने ठेवण्यात येणार आहेत.

-शिरीष आरदवाड, उपयुक्त, अग्निशमन विभाग