मेरिटाइम बोर्डाचा ‘ओएनजीसी’कडे प्रस्ताव; २५ कोटींच्या निधीची मागणी उरण तालुक्यातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या नागावच्या पिरवाडी समुद्रकिनारा पावसाळ्यातील समुद्रात येणाऱ्या महाकाय लाटांमुळे उद्ध्वस्त होत असून किनाऱ्यावरील शेकडो वर्षांची झाडे उन्मळून पडू लागली आहेत. वाढत्या लाटांचा धोका या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेती तसेच पिण्याच्या पाण्याच्या विहिरींच्या पाण्यावरही होऊ लागला आहे. त्यामुळे नागावच्या पिरवाडी किनाऱ्यावर धूप प्रतिबंधक बंधारा बांधण्यासाठी मागील पावसाळी अधिवेशनात मंजुरी मिळाली आहे. असे असले तरी यासाठीचा २५ कोटींचा निधी मिळावा याकरिता ओएनजीसीकडे मागणी करण्यात आली असून लवकरच या बंधाऱ्याचे काम सुरू होईल, अशी माहिती बंदर विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. नागावचा समुद्रकिनारा हा मुंबई, नवी मुंबई तसेच पनवेलसह रायगड जिल्ह्य़ातील पर्यटकांना नेहमीच खुणावतो. एक दिवसाचे पर्यटन स्थळ म्हणून शेकडो पर्यटक नागावच्या किनाऱ्यावर येतात. सुट्टीच्या दिवशी तर समुद्रकिनाऱ्यावरील पर्यटकांची संख्या मोठी असते. तसेच पावसाळ्यातही या ठिकाणी पर्यटकांचा राबता असतो. त्यामुळे या परिसरातील स्थानिकांना काही प्रमाणात रोजगारही उपलब्ध होत आहे. मात्र समुद्राच्या लाटांमुळे, विशेषत: पावसाळ्यात या किनाऱ्यांची मोठय़ा प्रमाणात धूप होत आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील शेकडो वर्षांची नारळी, फोफळींची तसेच इतर फळझाडे उखडून पडली आहेत. या लाटांमुळे येथील स्मशानभूमीही उद्ध्वस्त झाली आहे. या स्थितीची पाहणी २०१६ च्या पावसाळ्यात झाली होती. त्यानंतर पावसाळ्यानंतर बंधारा पूर्ण होईल असे आश्वासनही दिले होते; परंतु दुसरा पावसाळा महिनाभरावर असूनही निधीअभावी काम रखडले आहे. ७०० मीटर लांबीच्या या धूप प्रतिबंधक बंधाऱ्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाने निविदा तयार केली होती. यासाठी २५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यात किनाऱ्यावर मरिन ड्राइव्हप्रमाणे सिमेंटचे ट्रायपॉट तसेच चालण्यासाठी पदपथ असणार आहेत. याचा प्रस्ताव ओएनजीसीकडे पाठविला असून लवकरच मंजुरी मिळेल. - सुधीर देवरे, अभियंता, मेरिटाइम विभाग रायगड जिल्हा