नवी मुंबई : पावसाळ्यात कांदा, लसूनचे दर सामान्यांच्या आवाक्याबाहेर असतात. मात्र आता ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या वर्षी याच काळात दराने शंभरी गाठलेली लसून आता घाऊक बाजारात १० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत आहे. पावसाळा आला की कांदा आणि लसूण दरात वाढ होण्यास सुरुवात होत असते. त्यामुळे मे महिन्यात बहुतांश किरकोळ ग्राहक कांदा आणि लसणाची खरेदी करून साठवणूक करीत असतात. मात्र यावर्षी चित्र वेगळे आहे. कांदा आणि लसणाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत आवाक्यात आहेत. एपीएमसी बाजारात मंगळवारी लसणाची २० गाडी आवक झाली होती. मागील वर्षी जुलै-ऑगस्टमध्ये लसणाने शंभरी गाठली होती. मात्र यंदा लागवड आणि उत्पादन जास्त आहे, त्यामुळे लसणाचे दर आवाक्यात आहेत. एपीएमसी बाजारात देशी लसूण १० रुपये तर सर्वात उत्तम दर्जाचा लसूण ३५ ते ४० रुपयांनी उपलब्ध आहे.