महापालिकेची घणसोलीत सर्वाधिक कारवाई

नवी मुंबईत : शहरात पाण्याची उधळपट्टी होत असल्याचे लक्षात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने बेकायदा पाणी वापर करणाऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या काही दिवसांत कारवाई मोहीम हाती घेतली असून ४२२ बेकायदा नळजोडण्या खंडित करण्यात आल्या आहेत. ही कारवाई सातत्याने सुरूच राहणार असल्याचे पालिका प्रशासनाने सांगितले.

नवी मुंबईत मोरबे धरणातून ४५० दशलक्ष लिटर व एमआयडीसीकडून ८० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा करण्यात येतो. असे असतानाही शहराच्या काही भागांत विशेषत: एमआयडीसी पाणीपुरवठा करीत असलेल्या भागात पाणीटंचाई निर्माण होत आहे. तसेच एकूण लोकसंख्येच्या तुलनेत अधिकचा पाणीपुरवठा होत असूनही पाणी प्रश्न निर्माण होत असल्याने पालिका प्रशासनाने पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी दीर्घकालीन नियोजन हाती घेतले आहे.

यात शहरात बेकायदा पाणी वापर होत असल्याच्या तक्रारीही आहेत. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष केंद्रित केले असून बेकायदा नळजोडण्या घेतलेल्यांचा शोध सुरू केला आहे. गेली महिनाभर ही कारवाई सुरू असून आतापर्यंत ४२२ बकायदा नळजोडण्यांवर कारवाई केली आहे. त्यांच्याकडून दोन लाखांपेक्षा अधिकचा दंडही वसूल केला आहे. मोठय़ा प्रमाणात बेकायदा नळजोडण्या असल्याचे समोर आल्याने आता हे कशामुळे व कोणामुळे होते, याच्या मुळाशी जाण्याची तयारी प्रशासनाने ठेवली आहे.

एमआयडीसीकडून कमी पाणीपुरवठा

एमआयडीसीवर ८० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी आहे. मात्र त्यांच्याकडून गेली काही दिवस कमी पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे त्या पाण्यावर अवलंबून असणाऱ्यांना पाणी कमी पडत आहे. तुर्भे परिसरात तर अधूनमधून टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. एमआयडीसी ८० ऐवजी ६० तश् ७० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असल्याने हा प्रश्न निर्माण होत आहे. याबाबत पालका प्रशासनाने वारंवार एमआयडीसीला पत्र दिले आहे.

नवी मुंबई महापालिका क्षेत्रात एमआयडीसीकडून होणारा पुरवठा पूर्ण क्षमतेने होत नाही. तो मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. शहरात बोकायदा नळजोडण्या प्रशासनाने खंडित केल्या असून ही कारवाई सातत्याने होणार आहे. यापुढे बेकायदा पाणीपुरवठा खपवून घेतला जाणार नाही.

अभिजीत बांगर, आयुक्त, महापालिका