दहा दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी उरण मधील पोलिस प्रशासनाने तयारी केली असून उरण तालुक्यातील ९ सार्वजनिक तर १ हजार ७०३ घरगुती आशा १ हजार ७१२ मूर्तींचे विसर्जन करण्यात येणार आहे. हे विसर्जन शांततेत पार पडावे याकरिता वाहतूक पोलिसांनी उरण शहरातील विसर्जन तलावाच्या दिशेने येणारी वाहतूक वळवली आहे. तर वाहतूक कोंडीला कारणीभूत ठरणारी जेएनपीए बंदरातून ठाणे, नवी मुंबई परिसरात जाणारी जड कंटेनर वाहतुकीला शुक्रवारी सकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंदी केली आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : बाप्पा निघाले गावाला….चैन पडेना आम्हाला…

यामध्ये उरण शहरातील नगरपालिका कार्यालय ते विमला तलाव,देऊळवाडी पर्यंतचा मार्ग तसेच कोटनाका ते राजपाल नाका,कामठा ते विमला तलाव व आपला बाजार ते गणपती चौक हे शहरातील मार्ग विसर्जनासाठी सकाळी ९ ते रात्री १२ वाजेपर्यंत वाहतुकीसाठी बंद असतील.उरण शहरातील गणेश विसर्जनासाठी मार्गात येणारी वाहने ही काही अंतरावर थांबविण्यात येणार आहेत. याकरिता उरण शहरात वाहतूक पोलिसांना तैनात करण्यात आल्याची माहिती उरण वाहतूक विभागाचे उप पोलीस निरीक्षक संजय पवार यांनी दिली आहे. तर उरण तालुक्यातील गावोगावी होणाऱ्या गणेश विसर्जनाच्या वेळी पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. येथील गणेशमूर्तीचे विसर्जन हे पारंपरिक पद्धतीने गावातील सार्वजनिक तलावातून करण्यात येणार आहे.