उरण : द्रोणागिरी नोड ते पागोटे(राष्ट्रीय महामार्ग 348) ला जोडणाऱ्या सागरी महामार्गावरील खड्ड्यात मुसळधार पावसामुळे वाढ झाली असून सिडकोच्या सातत्यपूर्ण दुर्लक्षामुळे रस्त्यावरील खड्ड्याचे रूपांतर आता तळ्यात होऊ लागल्याने या महामार्गावर खड्डे आहेत की तलाव असा सवाल वाहनचालक व प्रवाश्यांना कडून केला जात आहे.

उरण मध्ये नव्याने विकसित होत असलेल्या द्रोणागिरी नोड शहराला तसेच उरणला जोडणाऱ्या द्रोणागिरी ते पागोटे या सागरी महामार्गाची उभारणी सिडको कडून करण्यात आली आहे. त्यामुळे उरण,द्रोणागिरी, खोपटे,उरणचा पूर्व भाग,अलिबाग,पेण व मुंबई गोवा मार्गा पर्यंत या सागरी मार्गावरून विना अडथळा वाहनांना कमी अंतरात प्रवास करता येत आहे. त्यामुळे या मार्गाचा वापर वाढला आहे. सहा पदरी असलेल्या या रस्त्यावर खोपटा पूल चौक ते जेएनपीटी ते पळस्पे या राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या मार्गात मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहेत.

हेही वाचा : विचित्र अपघातात रिक्षा थेट चढली झाडावर ; केबल्स वेटोळ्यांची करामत

या मार्गावरून दररोज हजारो कंटेनर व प्रवासी वाहने प्रवास करीत आहेत. त्यामुळे या रस्त्यावरील खड्ड्याचा त्रास वाहन चालक व प्रवाशांनी सहन करावा लागत आहे. चारचाकी वाहना बरोबरच दुचाकी वाहनेही याच मार्गाने ये जा करीत आहेत. एकाच वेळी जड कंटेनर वाहन व दुचाकीवरून जाणारे प्रवासी या मार्गाचा वापर करीत असल्याने या मार्गावरील दुचाकी वाहनाच्या अपघातात वाढ झाली आहे. त्यामुळे सिडकोने या मार्गाच्या दुरुस्तीची मागणी वाहन चालक व प्रवाशांनी केली आहे.