नवी मुंबई : मार्च महिन्यात अचानक वाढलेल्या तापमानाचा भाजीपाला उत्पादनावर परिणाम झाला असून तीव्र उन्हामुळे माल खराब होत आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी बाजारात आवक कमी होत असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी आहे. परिणामी भाजीपाल्याच्या दरात २० ते २५ टक्के वाढ झाली आहे.
एपीएमसी बाजारात टोमॅटो, भेंडी, कारली, फरसबी, पापडी, वांगी आणि पालेभाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. हिवाळय़ात भाज्यांचे उत्पादन अधिक असल्याने ५५० ते ६०० गाडय़ा आवक होत असते. मात्र उन्हाळा सुरू होताच भाज्यांची आवक घटत असते. सध्या बाजारात १५० ते २०० गाडय़ा आवक कमी होत आहे. त्यात उन्हामुळे भाजीपाला खराब होण्याचे प्रमाणही अधिक असल्याचे घाऊक व्यापारी नाना बोरकर यांनी सांगितले.
घाऊक बाजारात भेंडी आधी २४ ते २५ रुपयांवरून आता ३० रुपये तर पापडी ७० ते ७५ रुपयांवरून ९० रुपये, टोमॅटो १४ ते १५ रुपयांवरून १८ ते २० रुपये, फरसबी ७० ते ७५ रुपयांवरून ८० ते ९० रुपये, कारली २० ते २२ रुपयांवरून ३२ रुपये, वांगी २६ ते २८ रुपयांवरून ३४ ते ३५ रुपयांपर्यंत दरवाढ झाली आहे.
