सहा तासांच्या विरोधानंतर विरार ते अलिबाग महामार्गासाठी जमीन मोजणी रद्द उरण : विरार ते अलिबाग या बहुउद्देशीय महामार्गाच्या जमीन मोजणीचे काम गुरुवारी महसूल प्रशासनाने सुरू करण्याचा प्रयत्न केला असता शेतकऱ्यांच्या एकजुटीचा विजय असो, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, मनमानी करणाऱ्या सरकारचा व प्रशासनाचा धिक्कार असो, अधिकाऱ्यांची दादागिरी नही चलेगी आदी घोषणा देत महामार्गबाधित शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या मोजणीला संघर्षांचा पवित्रा घेत जोरदार विरोध दर्शविला. यावेळी प्रशासनाने कोणत्याही परिस्थितीत मोजणी करणार, असा हट्ट धरल्याने सकाळी १०.३० वाजल्यापासून ते दुपारी ४ वाजेपर्यंत हा संघर्ष सुरू होता. त्यानंतर पोलीस व प्रशासनाने शेतकऱ्यांचा विरोध लक्षात घेऊन जमीन मोजणी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावेळी प्रशासनाने प्रचंड फौजफाटाही मागविला होता, मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांना किती मोबदला मिळणार हे प्रशासन लेखी स्वरूपात देत नाही तोपर्यंत जमिनीची मोजणी करू न देण्याची ठाम भूमिका कळंबुसरे, चिरनेर, भोम, िवधणे, दादरपाडा, दिघोडे, टाकीगाव येथील शेतकऱ्यांनी घेतली. विरार ते अलिबाग दरम्यान एमएसआरडीसीकडून बहुउद्देशीय महामार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाच्या जमीन मोजणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. याची माहिती मिळताच या परिसरातील शेतकरी एक झाले. त्यांनी महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांना आपल्या जमिनीची मोजणी करण्यास विरोध केला. जोपर्यंत शेतकऱ्यांच्या प्रश्नांची उत्तरे देऊन प्रशासन शेतकऱ्यांना काय मोबदला देणार याची लेखी हमी देत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रकारे प्रशासनाला जमिनीची मोजणी करू दिली जाणार नाही, असा निर्धार करीत शेतकऱ्यांनी मोजणी अधिकाऱ्यांना मोजणी करण्यासाठी रोखण्याचा प्रयत्न केला. सहा ते सात तासांपासून शेतकरी व प्रशासनामध्ये संषर्घ सुरू होता. आज बैठक शेतकऱ्यांना जमिनीच्या मोजणीला प्रखर विरोध केल्याने शुक्रवारी पनवेलच्या उपविभागीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत मोजणी करण्यात येणाऱ्या कळंबुसरे, हरेश्वर पिंपळे, चिरनेर, भोम व टाकी गाव येथील शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.