लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : मुंबईसह राज्यभरात प्रचंड उष्माघातामुळे नागरिक हैराण झालेले असून पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा जलसाठाही कमी होऊ लागला आहे. स्वत:च्या मालकीचे धरण असलेल्या व जलसंपन्न शहर संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणातील जलसाठाही यंदाच्या उन्हाळ्यात प्रथमच ५० टक्क्यांच्या खाली आला आहे. सध्या धरणात ४९.३७ टक्के पाणी आहे. मात्र इतर शहरांच्या तुलनेत नवी मुंबईची स्थिती चांगली असून या साठ्यातून आणखी १३३ दिवस शहराला सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकतो.

मुंबई व राज्यातील विविध भागांना जुलै महिन्यापर्यंत पाणीपुरवठ्याचे आव्हान पेलावे लागणार असताना नवी मुंबईत मात्र मोरबे धरणात सध्या मागील दोन वर्षांपेक्षा अधिक जलसाठा शिल्लक आहे. परंतु तरीही नागरीकांनी पाण्याचा वापर जपूनच करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

मोरबे धरण परिसर व नवी मुंबई शहरात मागील वर्षी पावसाळ्यात चांगला पाऊस झाला होता. मोरबे धरण २८ ऑगस्ट २०२४ ला १०० टक्के भरले होते. त्यामुळे नवी मुंबईकरांची जलचिंता मिटली होती. धरणातून पाण्याचा विसर्गही करण्यात आला होता. परंतु वाढत्या तापमानामुळे बाष्पीभवन तसेच पाणी मागणीही वाढू लागली आहे. धरणातून दिवसाला ४५० दशलक्षलीटर पेक्षा अधिक पाणी उपसा केले जात असून त्यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे.

मोरबे धरणातील पाणीस्थिती

२०२३- २४ यावर्षीची स्थिती२०२४-२५ ची स्थिती
धरणात पडलेला एकूण पाऊस३७७०.४० मिमी.४२८० मिमी.
धरण पातळी ७४ .८३ मीटर७६.६५ मीटर
धरणातील जलसाठा८०.९६१ द.घ.मी९४.२४३ द.घ.मी
धरणात किती टक्के पाणीसाठा४२.४१ टक्के४९.३७ टक्के

जलसाठा किती दिवस पुरेल – १३३ दिवस

कधीपर्यंत सुरळीत पाणीपुरवठा करता येणार – २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत

पाणी उपशाबाबत योग्य काळजी घेण्यात येत आहे. वाढत्या उष्णतेमुळे पाण्याची मागणी वाढत आहे. तसेच बाष्पीभवनही वाढत आहे. धरणातील जलसाठा ५० टक्क्यापेक्षा खाली आला असला तरी पाणीपुरवठ्याबाबत योग्य खबरदारी घेतली जात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत अद्याप अधिक पाणीसाठा शिल्लक आहे. मात्र नागरिकांनी पाणी वाया घालवू नये. -अरविंद शिंदे, अतिरिक्त शहर अभियंता, नवी मुंबई महापालिका