मुंबई, ठाणे पालिका निवडणुकीसाठी नवी मुंबईतून कार्यकर्त्यांची कुमक मुंबई ठाणे पालिका निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रमुख पक्षांनी आजूबाजूच्या पालिका क्षेत्रातील कार्यकर्त्यांना तयार राहण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यामुळे नवी मुंबई पालिका क्षेत्रातून विविध पक्षांचे सुमारे पाच हजार कार्यकर्ते या दोन निवडणुकींसाठी पुढील काळात मुंबई व ठाण्यात तळ ठोकून राहणार आहेत. यात शिवसेना व भाजपा कार्यकर्त्यांची व्यहूरचना चांगली असून प्रत्येक प्रभागात किती व कोणते कार्यकर्ते जाणार आहेत. त्याची यादी तयार केली जात आहे. मुंबई ठाण्याची पालिका निवडणुक शिवसेना व भाजपा पक्षांसाठी प्रतिष्ठेची आहे. या दोन्ही शहरांवर सध्या शिवसेनेची सत्ता असून ती उलथवून ठाकण्याची भाजपाने तयारी केली आहे. त्यामुळे प्रचारासाठी आजूबाजूच्या नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मिरा भाईंदर या शहरातील अनेक कार्येकर्ते एक फेब्रुवारी पासून मुंबई, ठाण्यात प्रचाराचा धुरळा उडविणार आहेत. त्यासाठी अनेक कार्यकर्त्यांना तयार राहण्यास सांगण्यात आले असून नोकरीला असलेल्या कार्येकर्त्यांना सुट्टी घेण्यास सांगण्यात आले आहे. यासाठी काही जणांनी बाहेरगावी जाण्याच्या बेत रद्द केला आहे. प्रत्येक निवडणुकीला अशा प्रकारची कुमक नवी मुंबईतून पाठविली जाते. यंदा मुंबईची निवडणुक शिवसेनेसाठी अंत्यत प्रतिष्ठेची असल्याने नवी मुंबईतून जाणारे कार्यकर्ते जास्त आहेत. मुंबईतूनच नवी मुंबईत स्थलांतरीत झालेल्या शिवसेैनिकांची संख्या जास्त असल्याने मुंबईतील या जून्या शिवसैनिकांवर जास्त जबाबदारी टाकली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, भाजपा आणि मनसेचे सुमारे पाच हजार कार्येकर्ते या दोन निवडकीसाठी जाणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. या कार्यकर्त्यांना मुंबई, ठाण्यातील प्रभाग नेमून देण्यात आले असून तेथील मतदार यादीचा अभ्यास केला जात आहे. माझ्यावर व्यक्तिश: गोव्यातील निवडणूकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे मात्र नवी मुंबईतील शिवसैनिक मुंबई, ठाण्यात जाण्यास तयार असून प्रत्येक प्रभागात नवी मुंबईतील दहा बारा शिवसैनिक कामकाज पाहणार आहेत. त्यामुळे शहरातून सुमारे दोन हजार शिवसैनिक या दोन निवडणुकीत सहभागी होतील. विजय चौगुले, माजी जिल्हाप्रमुख व विरोधी पक्षनेता, नवी मुंबई भाजपाचे काम अंत्यत शिस्तबध्द पध्दतीने सुरु आहे. नवी मुंबईतील ९८० भाजपा कार्येकर्ते ही जबाबदारी पेलण्यास तयार आहेत. कल्याण डोंबिवली निवडणुकीत माझ्यावर जबाबदारी देण्यात आली होती ती आम्ही चांगल्या प्रकारे पार पाडली आहे. त्यामुळे यंदा मुंबई, ठाण्यात काम करण्याची संधी मिळणार आहे. रामचंद्र घरत, अध्यक्ष, भाजपा, नवी मुंबई. मुंबईतील प्रचाराची जबाबदारी न देता ठाण्यातील प्रचाराची धुरा आम्ही सांभाळणार आहोत. तसे अद्याप आदेश आले नसले तरी आमची तयारी झालेली आहे. नोटाबंदीचा मुद्दा यावेळी भाजपा शिवसेना युतीला जड जाणार आहे. त्यामुळे आमच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचे प्रभावी मुद्दे काढलेले आहेत. दशरथ भगत, अध्यक्ष, काँग्रेस, नवी मुंबई आमच्यावर विशेषत: ठाण्याची जबाबदारी राहणार आहे. मुंबईतील चेंबूर, मानखुेर्द, घाटकोपर, मुलुंड, भांडुप या भागातील प्रचारात नवी मुंबईतील आजी माजी नगरसेवकांनी सहभागी व्हावे अशी पक्षश्रेष्ठींच्या सूचना आहेत. त्यामुळे खाडीपलिकडील काही प्रभागात आणि ठाण्यात राष्ट्रवादीचे सर्व पालिकेतील पदाधिकारी व पक्ष कार्येकर्ते भाग घेतील संजीव नाईक, सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष