नवी मुंबईतील बारमालकाच्या हत्येप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या जंगलात सीबीडी येथील बारमालक वशिष्ठ यादव यांची हत्या करण्यात आली होती. १० फेब्रुवारीला उडपीमध्ये बेलनहल्लीजवळच्या कुक्के गावातील जंगलामध्ये त्यांचा मृतदेह आढळला होता. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत चौघांना अटक केली आहे.

पोलिसांकडून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे सुमित मिश्रा (२३), अब्दुल शुकूर (३५), अविनाश कारकेरा (२५) आणि मोहम्मद शरीफ (३२) अशी आहेत. सुमित हा माया बारमध्ये आधी काम करत होता. तर इतर तिघे जण एका ट्रॅव्हल कंपनीत कामाला होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुमित आणि वशिष्ठ यांच्यात तीन महिन्यांपूर्वी पैशांवरुन भांडण झालं होतं. यानंतर त्याने नोकरी सोडली होती.

सुमित याने वशिष्ठ यांना उडपी येथे आणलं आणि वायरीने गळा आवळून हत्या करण्यात आली. स्थानिकांनी मृतदेह पाहिल्यानंतर पोलिसांना कळवलं होतं. तपासासाठी पोलिसांचं एक पथक नेमण्यात आलं होतं. या पथकाने गुन्ह्यात वापरलेल्या कारचा शोध लावत आरोपींना अटक केली आहे. हत्येसाठी वापरण्यात आलेली कारही जप्त करण्यात आली आहे.