नवी मुंबई : प्लास्टिक वापरावर बंदी घालण्यात आली असतानाही नवी मुंबईत सर्रास प्लास्टिकचा वापर सुरू असल्याचे दिसून येत होते. यावर पालिकेच्यावतीने कारवाई सुरू केली. या कारवाईमध्ये अवघ्या चार दिवसा ३६ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त करून ३० हजार रूपयांचा दंड वसुल करण्यात आला.
सण उत्सवाच्या काळात खरेदीसाठी बाजारात प्लास्टिकचा वाढलेला वापर लक्षात घेत, नवी मुंबई महापालिकेच्या वतीने प्लास्टिक प्रतिबंध मोहिम हाती घेतली आहे.नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवली जात आहे. यामध्ये विशेष भरारी पथके नेमण्यात आली आहेत. या पथकांकडून प्लास्टिक पिशव्या जप्त करून दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. याच अंतर्गत महाराष्ट्र दिनी मुलुंड-ऐरोली टोलनाक्यावर मुंबईहून नवी मुंबईत प्लास्टिक पिशव्या आणल्या जात असताना ३० किलो साठा जप्त करण्यात आला.
या प्रकरणी राजेश गुप्ता यांच्याकडून ५ हजार रूपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर, ३० एप्रिल रोजी घणसोली गावातील दुकानातून १ किलो प्लास्टिक पिशव्या जप्त केल्या. आणि दंडात्मक कारवाई करण्यात आली. याच परिसरातील दुसऱ्या दुकानावरही कारवाई करण्यात आली. तसेच ३ मे रोजी कोपरखैरणे सेक्टर १ आणि ऐरोली सेक्टर ६ किराणा दुकानातून प्लास्टिक जप्त करत दंडात्मक कारवाई केली. या चार दिवसात ३६ हजार ३०० ग्रॅम प्लास्टिक जप्त करून ३० हजारांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
पालिकेकडून कापडी पिशव्या वापरण्याचे आवाहन
प्लास्टिकमुळे पर्यावरणाला आणि मानवी जीवनाला होत असलेला धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक एकल वापर प्लास्टिकचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांविरोधातकारवाई करण्यात येत आहे. तरी प्लास्टिकमुळे निर्माण होणारा धोका लक्षात घेऊन नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर पूर्णत: टाळावा. कापडी, कागदी पिशव्यांचा वापरावर नागरिकांनी भर द्यावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. तसेच व्यावसायिकांनीही पालिकेने आवाहन केले आहे. यामध्ये वस्तू देण्यासाठी प्लास्टिक पिशव्या देऊ नयेत. आणि प्लास्टिक पिशव्यांचा वापर दुकानात करू नयेत असे आवाहन पालिकेने केले आहे.
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून प्लास्टिक विरोधी मोहिम राबवली जात आहे. एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात घणसोली, वाशी, ऐरोली टोलनाका, दिघा अशा विविध शहरांमध्ये ही कारवाई करण्यात आली होती. मोठ्या प्रमाणावर प्लास्टिकचा साठा जप्त करून दंडात्मक कारवाई पालिकेने केली होती.