नवी मुंबई : नवी मुंबई, पनवेल, उरण या पट्ट्यात उभे रहाणारे आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रकल्प, झपाट्याने होत असलेले नागरीकरण आणि त्यामुळे वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता मुंबईसारख्या महानगरीला खेटून असलेल्या महामुंबईतही पायाभूत सुविधांच्या आघाडीवर अनेक आव्हाने उभी रहातील. या आव्हानांना तोंड देण्यासाठी सर्वच नियोजन प्राधिकरणांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता आहे, असे ठाम प्रतिपादन नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलींद भारंबे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना केले. उपनगरांमधील अंतर्गत पार्किगाचा प्रश्न आताच जटील बनू पहात आहे. या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी नियोजन प्राधिकरणांनी ठोस आणि भविष्यवेधी प्रकल्पांची आखणी करण्याची गरज असून शहरांच्या विकास आराखड्याचा सातत्याने फेरअभ्यास आणि आढावा घेण्याची आवश्यकताही भारंबे यांनी व्यक्त केली.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, एज्यु सिटी, तिसरी मुंबई, लाॅजिस्टीक पार्क, डेटा सेंटर्स असे भविष्यवेधी प्रकल्प नवी मुंबईत उभे रहाणार आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर व्यापारवृद्धीचे हे केंद्र ठरावे अशापद्धतीची आखणी केंद्र आणि राज्य सरकारकडून केली जात आहे. एकीकडे हे होत असताना शहरातील जवळपास प्रत्येक उपनगर पुर्नविकासाच्या प्रक्रियेतून जात आहे. शहराची आभाळरेषाच यामुळे बदलणार आहे. यामुळे शहरात नियोजनाची अनेक आव्हान येत्या काळात उभी रहातील. यापैकी सर्वाच मोठे आव्हान हे पार्किंगचे असेल, असे भारंबे यांनी सांगितले. यापूर्वी ज्या घरात एक वाहन नव्हते त्या कुटुंबात आता तीन-तीन वाहने आली आहेत. ही वाहने उभी करायची कुठे, कशी हा प्रश्न आवासून उभा राहिला आहे. शहर पुनर्विकासाच्या प्रक्रियेतून जात असताना याविषयी गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे, असे त्यांनी सांगितले. अन्यथा रस्त्याच्या कडेला उभी रहाणारी वाहने आणि पोलिसांकडून केल्या जाणाऱ्या कारवाया हे चित्र आपल्याला नित्याचे पहायला मिळेल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
भविष्यातील वाढत्या वाहनांची संख्या ध्यानात घेऊन शहरातील इमारतींसोबत बाजारालगत वाहनतळांचे नियोजन प्राधिकरणाने विकास आराखड्यात करणे गरजेचे आहे, असे भारंबे यांनी स्पष्ट केले. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल ते अलिबाग या पट्यात उभारले जाणारे उड्डाणपुल, विविध कॉरीडॉर यामुळे भविष्यात सर्वसामान्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जवळची वाटू शकेल, असा दावाही त्यांनी केले. मेट्रो, विरार अलिबाग बहुउद्देशीय मार्गिका, दिल्ली मुंबई कॉरीडॉर, दिल्ली जेएनपीटी फ्रेट कॉरिडॉर यामुळे दळणवळणाची नवी दिशा या परिसराला मिळेल, असेही ते म्हणाले.
बहुमजली वाहनतळाची गरज
वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी पोलीस विभागाची आहेच. परंतु वाढत्या वाहनांसाठी अधिकची वाहनतळ असणे हा त्या त्या नियोजन प्राधिकरणांचा कामाचा भाग आहे. या शहरात बहुमजली वाहनतळ आणि प्रशस्त रस्ते यांची आखणी करण्याची गरज सतत भासणार आहे. जेएनपीए सारखे बंदर आणि नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ तसेच भविष्यात होत असलेल्या लॉजिस्टिक पार्कमुळे शहराचा विकासाचे वेग वाढला आहे. त्यामुळे विकास आराखड्यावर सुद्धा लवकर बदल करण्याची गरज भासू शकेल, असे ते म्हणाले.