नवी मुंबई : ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबईत दरवर्षी हिवाळा-उन्हाळ्याच्या हंगामात मोठ्या थव्यांनी दाखल होणाऱ्या फ्लेमिंगो पक्षांची अद्याप प्रतीक्षा कायम आहे.

मात्र, नेरुळमधील टी.एस. चाणक्य परिसरातील पाणथळ भाग विविध स्थलांतरित पक्ष्यांच्या उपस्थितीने गजबजून गेला असून, फ्लेमिंगो नसतानाही जैवविविधतेचे समृद्ध चित्र पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकारांना अनुभवता येत आहे.

मॅरिटाइम विद्यापीठाच्या मागील बाजूस असलेल्या या पाणथळ भागात २ व ३ एप्रिल रोजी स्थानिक पक्षीनिरीक्षक डॉ. अनिल कुर्‍हे यांनी सकाळच्या सत्रात निरीक्षण करताना सुमारे ५०० पक्ष्यांची नोंद केली.

या वेळी कॉर्मोरंट, पेंटेड स्टॉर्क, सँडपायपर, ब्लॅक-विंग्ड स्टिल्ट, कर्ल्यू, स्पूनबिल, आयबिस, प्लोव्हर, विविध प्रकारचे टर्न आणि सीगल यांसह अनेक पाणपक्षी व किनारी पक्षी मोठ्या संख्येने दिसून आले. याशिवाय बगळे, मुनिया व स्टार्लिंग यांसारखे पक्षीही या भागात आढळले. त्यामुळे पक्षीनिरीक्षक आणि छायाचित्रकारांसाठी हा परिसर आकर्षणाचे केंद्र ठरत आहे.

फ्लेमिंगोंची संख्या मात्र यंदा अत्यल्प असून, वेगवेगळ्या दिवशी केवळ १५ ते २० पक्षीच दिसून आल्याचे कुर्‍हे यांनी सांगितले. सामान्यतः नोव्हेंबर ते मे या कालावधीत हजारोंच्या संख्येने फ्लेमिंगो नवी मुंबईतील पाणथळ भागात वास्तव्य करतात. त्या तुलनेत यंदाची संख्या लक्षणीयरीत्या घटली आहे. यामुळे पक्षीनिरीक्षणासाठी येणाऱ्या निसर्गप्रेमींची गर्दी काही प्रमाणात घटल्याचेही स्थानिकांकडून सांगितले जाते.

दरम्यान, शहरात फ्लेमिंगोंच्या घातलेल्या संख्येमागे कच्छच्या रणातील परिस्थिती कारणीभूत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. यंदा पावसाळा उशिरा संपल्याने तेथील पाण्याची पातळी दीर्घकाळ टिकून राहिली आणि फ्लेमिंगोंचे प्रमुख अन्न असलेल्या शेवाळाची मुबलक वाढ झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर फ्लेमिंगो तेथेच थांबले असून, नवी मुंबईकडे त्यांचे स्थलांतर कमी झाल्याचे पक्षीप्रेमी आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सुनील अग्रवाल यांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या मते, परिस्थिती अनुकूल झाल्यानंतर फ्लेमिंगो पुढील काही आठवड्यांत नवी मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत, फ्लेमिंगो नसले तरी इतर विविध पक्ष्यांच्या उपस्थितीमुळे शहरातील पाणथळ भाग समृद्ध जैवविविधतेचे दर्शन घडवत असल्याचे चित्र आहे.

कच्छमध्येच का थांबले फ्लेमिंगो?

पक्षीप्रेमी व पर्यावरणवादी कार्यकर्ते सुनील अग्रवाल यांच्या मते गुजरातच्या कच्छच्या खाडीत पाण्याची पातळी अद्याप स्थिर असल्याने फ्लेमिंगो महाराष्ट्रात आलेले नसावेत. कच्छच्या खाडीत फ्लेमिंगोना प्रजननासाठी अनुकूल परिस्थिती असल्याने मोठ्या प्रमाणात हे पक्षी कच्छच्या खाडीत अधिवास करतात. हे पक्षी ऑक्टोबर ते मार्च या काळात तिथे वास्तव्यास असतात.

गेल्यावर्षी पाऊस चांगला पडल्याने त्याचा देखील फ्लेमिंगोच्या स्थलांतरावर परिणाम झाला असावा. गुजरातमध्ये फ्लेमिंगोसाठी सध्या पोषक वातावरण तयार झाले असल्याने फ्लेमिंगोंना महाराष्ट्रात येण्यास विलंब लागत असल्याचा अंदाज त्यांनी वर्तविला आहे.

मात्र परिस्थिती सुधारल्यास ते लवकरच नवी मुंबईत दाखल होतील. मे च्या पूर्वार्धात फ्लेमिंगो नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरात दाखल होण्याची शक्यता सुनील अग्रवाल यांनी व्यक्त केली आहे.