पुनाडे येथील एका आदिवासी तरुणाला सर्प दंश झाल्यानंतर त्याला उपचारसाठी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता येथील वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी रात्रपाळी असतांनाही झोपी गेले होते. त्यामुळे या तरुणावर वेळेत उपचार करण्यासाठी ६० किलोमीटर अंतरावरील नवी मुंबईतील अंतर खाजगी वाहनाने पार करावे लागले. यासाठी सर्प मित्रांनी मदत केल्याने त्या तरुणाचा जीव वाचू शकला आहे. मात्र या घटनेमुळे प्राथमिक उपचारासाठी उभारण्यात आलेली वैद्यकीय यंत्रणा झोपी गेल्याने नागरिकां कडून संताप व्यक्त केला जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>जामिनावर सुटताच चोराने पुन्हा केली चोरी, चिखलात उमटलेल्या एका पायाच्या ठशावरुन झाली अटक

उरण मधील पुनाडे च्या दुर्गम आदिवासी पाड्यावरील सुरेश अंबाजी कातकरी (२२) या तरूणाला मंगळवारी रात्री साडेबारा वाजता मण्यार जातीच्या सापाचा दंश झाला. अत्यंत विषारी असलेल्या या सापाच्या दंशाने व्यक्तीचा मृत्यू होवू शकतो. नागापेक्षा दहा पट जहाल या सापाचे विष असते. रात्री सर्प दंश झाल्यानंतर येथिल आदिवासींनी सर्वात प्रथम त्यांनी सर्पमित्र जयवंत ठाकूर यांना माहिती दिली. त्यांनी ताबडतोब तेथे जवळच असणाऱ्या गोरख म्हात्रे या तरूणाला रात्री आदिवासी वाडीवर पाठवून तेथिल परिस्थिती जाणून घेतली. त्यानंतर त्याला उपचारासाठी जवळच्या कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले. मात्र कोप्रोली आरोग्य केंद्रातील कर्मचारी आणि वैद्यकीय अधिकारी गाढ झोपले होते. त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला परंतू त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तोपर्यंत सर्पमित्र जयवंत ठाकूर आरोग्य केंद्रात आले. त्यानी आरोग्य केंद्राच्या १०८ क्रमांकावर रुग्णवाहिकेला कॉल केला. मात्र तेथे देखिल एम्ब्यूलंन्सचे डॉक्टर नव्हते. अखेर उलवे मधील रुग्णवाहिका उपलब्ध झाली. मात्र उलवे नोड पर्यंत पोहचण्यासाठी ३५ ते ४० मिनिटे लागणार होती.त्यामुळे वेळ वाया जावू नये यासाठी सर्प मित्रांनी खाजगी वाहनाने त्यांना रुग्णवाहिके पर्यंत उलवे येथे नेण्याचा निर्णय घेतला. मात्र उलवे च्या अँम्ब्यूलन्स ची आणि त्यांची पुन्हा एकदा चुकामुक झाली. अखेर त्याच खाजगी वाहनाने सर्पदंश झालेल्या तरूणाला वाशी येथिल महानगरपालिकच्या रुग्णालयात नेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा >>>उरण : विमला तलावातील पदपथाला पडलेलं भगदाड वाढलं

तोपर्यंत खूप वेळ वाया गेला होता. रुग्णालयात उपचार सूरू होईपर्यंत सर्प दंश झालेल्या तरूणाच्या रक्तात विष भिनायला सुरूवात झाली होती. त्याला उलट्या होवू लागल्या होत्या. सर्पमित्रांनी घाईघाईत हॉस्पिटलचे सर्व सोपस्कार उरकून त्याला अतिदक्षता विभागात दाखल केले आणि त्याच्यावर उपचार सुरू झाले. पहाटे साडेचार वाजेपर्यंत सर्पमित्र या तरूणाचे प्राण वाचविण्यासाठी धडपडत होते. हा सर्प दंश झालेला रूग्ण आहे त्या परिस्थितीत फक्त कपड्यांवर उपचारासाठी बाहेर पडला होता. खिशात एक रूपयाही नव्हता. फक्त एक डिस्चार्च झालेला मोबाईल होता. अशा वेळेला सर्पमित्रांनी त्याच्या उपचारासाठी लागणारी वैद्यकीय साहित्य विकत आणून दिले आणि त्याच्या पत्नीच्या हातात थोडेसे पैसे देवून पहाटे हॉस्पिटल मधून बाहेर पडले.दुर्गम आदिवासी वाड्यांवर सर्प दंश होण्याचे प्रमाण जास्त असते. त्यांना तातडीने जवळ उपचार मिळणे गरजेचे असते. कोप्रोली आरोग्य केंद्रात सर्पदंशावर उपचार होतात मात्र तीथे वेळेवर कधीच तीथे डॉक्टर उपलब्ध नसतात. त्यामुळे सर्पदंश झालेल्या रूग्णाला वाशी येथे हलवावे लागते.

कोप्रोली आरोग्य केंद्रातील व्यवस्था सुधारणे गरजेचे आहे. – जयवंत ठाकूर, सर्पमित्र

या घटनेची मला कल्पना नाही. असा प्रकार घडला असेल तर ती खूप चिंतेची बाब आहे. या बाबत मंगळवारी रोजी रात्रपाळीला कोण कर्मचारी, वैद्यकीय अधिकारी होते त्यांची चौकशी केली जाईल आणि त्यांच्यावर कारवाई केली जाईल. – डॉ.राजाराम भोसले, वैद्यकीय अधिकारी ,प्राथमिक आरोग्य केंद्र कोप्रोली

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neglect of medical officers and staff in rural health system in uran amy
First published on: 07-10-2022 at 18:20 IST