लोकसत्ता टीम

नवी मुंबई: नवी मुंबई महापालिकेने शहरातील धोकादायक इमारतींची यादी जाहीर करून त्यांना खाली करण्याच्या नोटीस पाठवण्यात आलेल्या आहेत. मुबंई कृषि उत्पन्न बाजार समिततील कांदा बटाटा बाजारातील आणि मसाला बाजारातील मध्यवर्ती इमारतीला अतिधोकादयक इमारत म्हणून खाली करण्यातबाबत महापालिका आणि एपीएमसी प्रशासनाने नोटीस पाठवली आहे. मात्र याला कांदा बटाटा आडत व्यापारी संघ आणि मसाला मध्यवर्ती इमारतीत गाळे धारकांनी खाली करण्यास नकार दिला असून संरचनात्मक परिनिरिक्षण करून इमारतीची दुरुस्ती करून वापरता येईल अशी मागणी निवेदनातून केली आहे.

कांदा, बटाटा बाजारात असलेल्या इमारतींचे पुर्नबांधकामाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने १२ जुलै २००५ आदेश दिलेला आहे. या आदेशाची प्रभावीपणे अंमलबजावणी मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीने केलेली नाही. तसेच जानेवारी २००४ मध्ये व सन २०१९ मध्ये नवी मुंबई महानगरपालिका संरचना अभियंता यादीमध्ये नमूद असलेले स्ट्रक्टवेल डिझाईनर्स अँड कन्सलटंट प्रा.लि. यांच्याकडून कांदा, बटाटा बाजाराचे व सर्व २३४ गाळ्यांचे संरचनात्मक परिनिरिक्षण अहवाल घेण्यात आले आहेत. या अहवालानुसार कांदा, बटाटा मार्केटमधील इमारती सी १ दर्जाऐवजी सी २ बी या प्रकारात मोडत आहे, त्यामुळे कांदा, बटाटा मार्केट मधील इमारती या अतिधोकादायक नाहीत, या अहवालाच्या प्रती बाजार समिती व नवी मुंबई महानगरपालिकेस सादर करण्यांत आल्या आहेत व या अहवालात नमूद असलेल्याप्रमाणे गाळाधारकांनी आवश्यक त्या दुरुस्त्या, देखभाल केल्यास २० वर्षे मार्केट सुस्थितीत राहील. या सूचनांचे गाळा धारकांनी पालन करून गाळे दुरुस्ती, रंग रंगोटी व देखभाल केली आहे. त्यामुळे सन २००५ ते २०२२ या १८ वर्षांच्या कालावधीमध्ये मार्केटमध्ये एकही अपघात किंवा दुर्घटना घडलेली नाही.

आणखी वाचा- नवी मुंबई : शहराच्या सौंदर्याला हरताळ, नेरुळमध्ये उद्यान-सभागृहाच्या संरक्षक भिंती बनल्या आहेत कपडे वाळत टाकण्याच्या जागा

गाळाधारकानी गाळ्यांच्या छतावर पावसाच्या पाण्यापासून बचाव होण्यासाठी रेनशिट टाकलेले आहे. त्यामुळे संपूर्ण बाजार आवारातील सदनिका, गाळ्यांमध्ये लिकेज, सिपेज नाही. बाजारातील सदनिका, गाळे या तळमजल्याचे स्ट्रक्चर आहेत त्यावर कोणताही लोड किंवा बोजा नाही. तसेच कोणत्याही गाळ्याची जमीन घसलेली नाही. बाजारातील सामाईक पॅसेजवरील स्लॅब जे खराब झाले होते ते बाजार समितीने तोडून तेथे पी.व्ही.सी. शीट लावलेले आहेत असे निवेदनात म्हटले असून कांदा, बटाटा मार्केटमधील सामायिक कॅन्टीन, स्वच्छतागृह व त्यालगतचा परिसर आणि शेतमाल चढउतार धक्यावरील स्लॅब कमकुवत झालेले असून ते काढून टाकणे, त्यांना योग्य सपोर्ट देणे किंवा तज्ञाच्या मदतीने त्यांची योग्य ती तातडीने दुरुस्ती बाजार समितीने करणे आवश्यक आहे. जेणेकरून कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याकडे एपीएमसीने लक्ष द्यावे तसेच बाजाराची पुनर्बांधणी एपीएमसीने सुरू करावी अशी मागणी केली आहे.