लोकसत्ता प्रतिनिधी
नवी मुंबई : शहरात वृक्षांवर खिळे ठोकून रोषणाई केली जाते. त्यामुळे महापालिकेने दंड आकारण्याच्या निर्णयाची सुरुवात केली. बेलापूर सेक्टर ३ येथील एका बार व रेस्टॉरंटवर झाडाला विद्युत रोषणाई केल्याने १० हजार रुपयांचा दंड वसूल केला असून पुढील आठवड्यात शहरात विशेष कारवाई मोहीम महापालिका हाती घेणार आहे.
वृक्षांवर खिळे ठोकणे व विद्युत रोषणाई यामुळे वृक्षांना धोका निर्माण होत असल्याने नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील वृक्षराजीवर परिणाम होऊन पर्यावरणाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. म्हणून महापालिकेने नुकसान केल्यास प्रतिझाड १० हजार रुपयांप्रमाणे दंड आकारण्यात येणार असल्याचा निर्णय घेतला होता. पालिका वृक्ष प्राधिकरणाने नुकत्याच झालेल्या ठरावाप्रमाणे शहरातील वृक्षांवर खिळे ठोकणे, विद्युत रोषणाई करणे व वृक्षास इजा पोहचविणाऱ्या व्यक्ती, संस्था, व्यावसायिक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्याबाबत निर्णय घेतला. त्यानुसार अशा नागरिक, संस्था, व्यावसायिक यांच्याकडून प्रतिवृक्षाप्रमाणे १० हजार रुपये इतका दंड आकारणेबाबत साहाय्यक आयुक्त तथा वृक्ष अधिकारी यांच्यामार्फत कारवाई सुरु करण्यात आली आहे.
पालिकेच्या या निर्णयामुळे वृक्षांवर खिळे ठोकणे व विद्युत रोषणाई करून पर्यावरणास बाधक ठरणाऱ्या गैरप्रकारांना आता आळा बसेल तसेच शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या वृक्षांचे व पर्यावरणाचे रक्षण होईल अशी अपेक्षा आहे. यासाठी नागरिकांनी शहराच्या पर्यावरण रक्षण व संवर्धनासाठी पालिकेला सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.
शहरात १९७ उद्याने असून २५२ रस्ता दुभाजक, ट्री बेल्ट व मोकळ्या जागा यांचे नैसर्गिक सौंदर्य अधिक वाढवण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. पालिका जास्तीत जास्त वृक्षलागवडीसाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे झाडांवर खिळे ठोकून जाहराती लावणे तसेच विद्युत रोषणाई करणे असे प्रकार वाढत असल्याने पालिकेने कडक कारवाईचा बडगा उगारला आहे. बेलापूर ते वाशी दरम्यान सर्व विभागांत मोठ्या प्रमाणात झाडांवर रोषणाई तसेच खिळे ठोकून जाहिराती लावणे असे प्रकार पाहायला मिळत आहेत. या कारवाईचे नागरिक तसेच पर्यावरणप्रेमींकडूनही स्वागत करण्यात येत आहे.
वृक्षसंपदा १५ लाखांहून अधिक
वृक्षगणनेच्या अहवालानुसार २१६ प्रजातींचे वृक्ष असून शहरात एकूण १५ लाख २८ हजार ७७९ वृक्षसंपदा आहे. तसेच शहरात एकूण १६३८ हेरिटेज वृक्ष आहेत. त्यामुळे पालिका क्षेत्रातील वृक्षसंपदेच्या जपणुकीसाठी पालिकेने कारवाईचे उचलेले पाऊल स्वागतार्ह असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले.
नवी मुंबई शहरात यापुढे झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावणे, झाडांना विद्युत रोषणाई करणे असे प्रकार केल्यास संबंधितांवर दंडात्मक कारवाई करून एका झाडामागे १० हजार रुपयांचा दंड आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले होते. त्याप्रमाणे पालिकेने बेलापूर विभागातून कारवाईला सुरुवात केली असून पुढील आठवड्यात संपूर्ण शहरात कारवाईची विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. -किसनराव पलांडे, उपायुक्त, नमुंमपा
नवी मुंबई शहरात वृक्षसंपदेवर विद्युत रोषणाई मोठ्या प्रमाणावर केली जाते तसेच झाडांना खिळे ठोकून जाहिराती लावल्या जातात. पालिकेने घसघशीत दंड आकारण्याचा निर्णय घेतला व त्याची अंमलबजावणी सुरु केली याचा आनंद आहे. सातत्याने अशी कारवाई व्हायला पाहिजे. -आबा रणावरे, वृक्षप्रेमी