बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर नीट आणि इतर शैक्षणिक विभागांमध्ये प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य असते. विद्यार्थ्यांची शैक्षणिक अडचण ध्यानात घेता जात पडताळणी प्रमाणपत्रासाठी विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ होते. हा धावपळ थांबवण्यासाठी पनवेलमध्ये मंगळवारी (२० स्प्टेंबर) एकदिवसीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण विभागीय आयुक्त, पनवेलचे प्रांतअधिकारी राहुल मुंडके व तहसिलदार विजय तळेकर यांनी संयुक्तपणे निर्णय घेऊन खास विद्यार्थ्यांसाठी हे शिबिर राबविले आहे.

हेही वाचा- सहकारी बँकांच्या प्रतिमा संवर्धनासाठी महिला संचालिकांचा ज्ञानाधिष्ठित सहभाग आवश्यक – विद्याधर अनास्कर

केंद्र सरकारचा १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर हा सेवा पंधरवडा सूरु आहे. या पंधरवडा अंतर्गत पनवेलमध्ये एक दिवसीय जात वैधता प्रमाणपत्र शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिराअंतर्गत विद्यार्थी एकाच छताखाली विद्यार्थी जात वैधतेचा अर्ज जिल्हा समितीसमोर भरु शकतील. या अर्जांवर दोनच दिवसांत प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे जातीचे दाखले आहेत. मात्र ज्यांना जात पडताळणी वैधतेचे प्रमाणपत्र हवे आहे अशा विद्यार्थ्यांकडून या शिबीरात अर्ज भरुन घेतला जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील जात वैधता समिती दोन दिवसात या अर्जांची छाणनी करुन त्यावर निर्णय देणार आहे. ९० विद्यार्थ्यांचे अर्ज यापूर्वीच जात वैधता समितीकडे प्रलंबित आहेत. त्या विद्यार्थ्यांना याच शिबिरात प्रमाणपत्र देण्यात येणार असल्याची माहिती तहसिलदार तळेकर यांनी दिली.