नवी मुंबई : शहरात अडीच हजारावर गेलेली दैनंदिन रुग्णसंख्या घटत हजाराच्या घरात आली आहे. मात्र लक्षणे गंभीर नसल्याने करोनाबाधित घरीच उपचार घेत आहेत. त्यामुळे शहरातील फक्त २० टक्के रुग्णशय्यांवर उपचाराधीन रुग्ण उपचार घेत आहेत. नवी मुंबईत करोना रुग्णांसाठी ७,५०२ खाटा विवध रुग्णालये व काळजी केंद्रात आहेत. पालिकेचे १२ हजार खाटा उपलब्ध करण्याचे नियोजन आहे. मात्र ७,५०२ खाटांपैकी ६,१०७ खाटा शिल्लक आहेत. २४ डिसेंबरपूर्वी दिवसाला २० नवे रुग्ण शहरात सापडत होते. त्यानंतर रुग्णवाढ होत ती दिवसाला २५०० पेक्षा अधिक झाली. पण करोनाबाधित झालेल्यांना लक्षणे दिसून येत नव्हती. त्यामुळे अनेक जण घरीच राहून उपचार घेत असल्याचे पाहायला मिळत आहे. शहरात दिवसाला नव्या करोना रुग्णांची संख्या १ हजाराच्या वर आहे, तर उपचाराधीन रुग्ण हे १० हजाराच्यावर असताना प्रत्यक्षात रुग्णालयात जाऊन उपचार घेणाऱ्यांची संख्या खूपच कमी आहे. महापालिकेनेही ५० व ६० वर्षांवरील तसेच सहव्याधी असलेल्यांना व लक्षणे असणाऱ्यांनाच पालिकेच्या करोना रुग्णालयात व काळजी केंद्रात खाटा देण्यास प्राधानय दिले आहे. तसेच तीन दिवसातच रुग्ण बरे होत आहेत. १० दिवसांचा उपचाराचा कालावधी सात दिवसांवर आल्याने करोनामक्त होणाऱ्यांचे प्रमाण अधिक आहे. दिवसाला २ हजारांपेक्षा अधिक रुग्ण बरे होऊन घरी जात आहेत. त्यामुळे रुग्णांसाठीच्या खाटा शिल्लक आहेत. बहुतांश लक्षणेविरहित बाधित आढळून येत असून तीन दिवसातच बरे वाटत असल्याने दिलासा आहे. तसेच घरीच उपचार घेणाऱ्यांची संख्या अधिक आहे. शहरात ८० टक्क्यांहून अधिक खाटा उपलब्ध आहेत, असे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी सांगितले. रुग्णशय्यांची उपलब्धता खाटा एकूण खाटा रुग्ण उपचार शिल्लक खाटा साध्या ४०९८ ७८० ३३१८ प्राणवायू २४३७ ३८७ २०५० अतिदक्षता अतिदक्षता खाटा ७०४ २०२ ५०२ जीवरक्षक प्रणाली २६३ २६ २३७ एकूण ७५०२ १३९५ ६१०७