नवी मुंबई महानगर पालिकेकडून दरवर्षी आर्थिक दुर्बल घटकातील गरजू विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते आणि त्यासाठी महापालिका अर्ज मागवते. यावेळी नवी मुंबई महापालिकेने राष्ट्रीयकृत बँकेची अट घातली आहे. त्यामुळे पालकांना बँकेत खाते उघडण्यासाठी कागदपत्रे प्रक्रिया ते पडतळणीसाठी बँक-शाळा असे खेटे मारावे लागत असल्याने पालकांची पुरती दमछाक होत आहे.
गेले अनेक वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेडून शिष्यवृत्ती देण्यात येत आहे. परंतु, मागील ४ वर्षांपासून या शिष्यवृत्ती योजनेला भरघोस प्रतिसाद मिळत असून जास्तीत जास्त अर्ज दाखल होत आहेत. करोनामुळे शिष्यवृत्ती वितरणाला खो बसला होता, परंतु आता शिष्यवृत्ती प्रक्रिया सुरू झाली असून ३१ जानेवारीपर्यंत अर्ज करण्याची अंतिम तारीख दिली आहे. परंतु, या दरम्यान पालकांना राष्ट्रीयकृत बँकांमध्ये खाते उघडणे यासाठी करावी लागणारी प्रक्रिया, बोनाफाईड सर्टिफिकेट, तसेच इतर कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी बँक आणि शाळांमध्ये बहुतांश वेळा ये-जा करावी लागत असून यासाठी १५ ते २० दिवसांचा कालावधी लोटत आहे. आता दिवसही कमी उरले आहेत, त्यामुळे पालकांमधून शिष्यवृत्ती योजनेचा अर्ज भरण्यासाठी मदत वाढ देण्याची मागणी होत आहे.
हेही वाचा – नवी मुंबई शहराचे आकर्षण असलेले वंडर्स पार्क फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरु होणार?
नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ३१ जानेवारी आहे. परंतु, पालकांमधून मुदत वाढवण्यासाठी मागणी होत असल्याने आयुक्तांसमवेत चर्चा करून ही मुदत वाढ करण्याचे नियोजन आहे, असे समाजविकास विभागाचे उपायुक्त दादासाहेब चाबुकस्वार म्हणाले.