नवी मुंबई : शीव-पनवेल मार्गावरील उरण फाटा येथील उड्डाणपुलावर आयपीएल सामान्यांमुळे दुरुस्ती कामात विलंब झाला. परिणामी पावसाच्या तडाख्याने उड्डाणपुलाची चाळण झाली आहे. जागोजागी खड्डे पडले आहेत. रस्त्याचा पहिला थर वाहून गेल्याने आतील लोखंडी पट्टय़ाबाहेर आल्याने दुचाकीस्वारांसाठी मृत्यूचे सापळे बनत आहेत. राज्यात सर्वात रहदारीच्या मार्गापैकी शीव-पनवेल मार्ग नवी मुंबई शहरातून जातो. या मार्गावर रोज हजारो वाहनांची ये-जा होत असते. गोवा, उत्तर पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा हा सर्व भाग याच मार्गाने मुंबईस जोडला गेला आहे. त्यामुळे केवळ प्रवासी वाहतूकच नाही तर दुचाकी रिक्षा ते जड अवजड वाहनांची २४ तास येथे ये-जा सुरु असते. वाहतूक सुकर होण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती करण्यात आली. उड्डाणपुलावरील रस्ते हे डांबरी असल्याने पावसाळय़ात खड्डे पडताच यंदाही हे खड्डे सर्वाधिक उरण फाटय़ावरील उड्डाणपुलावर पडले आहेत. वास्तविक पावसाळापूर्व कामे व्यवस्थित झाले असते तर ही वेळ आली नसती. दोन-तीन महिन्यांपूर्वी या ठिकाणी रस्त्यांची कामे अर्धवट झाली आहेत. मात्र उर्वरित ठिकाणी पावसाळय़ात एवढय़ा जुलैच्या सुरुवातीलाच खड्डे पडल्याने अजून तर पावसाळा बाकी आहे. त्यामुळे पुढे काय अवस्था होईल हे सांगता येत नाही, नियमित येथून ये-जा करणारे प्रवासी बसचालक अमित बन्सल यांनी अशी खंत व्यक्त केली. या सस्त्यावर लोखंडी उघडय़ा पट्टय़ा रस्त्याच्या समांतर आल्या आहेत. त्यातच वाहन संख्या प्रचंड असल्याने पट्टय़ा अत्यंत गुळगुळीत झाल्या आहेत. त्यात ऐन पावसात थोडे ब्रेक लावले तर दुचाकीस्वार हमखास घसरून पडतो. त्यात मागून येणाऱ्या वाहनचालकाचे नियंत्रण नसेल तर जीवघेणा अपघात होऊ शकतो. त्यामुळे निदान या पट्टय़ाचे तरी काम लवकरात लवकर व्हावे अशी आशा अक्षय कांबळे या दुचाकीस्वाराने व्यक्त केली. आयपीएल सामन्यांमुळे रस्ते कामास विलंब २६ मार्च ते २९ मे दरम्यान आयपीएलचे सामने होते. यातील २० सामने हे नेरुळ येथील डॉ. डी वाय पाटील आंतरराष्ट्रीय मैदानात खेळवले गेले . नेमके याचदरम्यान उरण फाटय़ावरील उड्डाणपुलाचे सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू होते. या कामांना सुरुवातच करण्यात आली. मात्र आयपीएल सामने संपल्यावर ही कामे हाती घेतले. मात्र नंतर पावसाळा सुरू झाला व ही कामे पूर्ण ठप्प झाली. आयपीएलदरम्यान सामने पाहण्यास राज्यभरातून क्रिकेटप्रेमी येथे येत असल्याने वाहतूक व्यवस्था चोख ठेवण्यासाठी रस्ते बांधकामाला वाहतूक पोलीस परवानगी देत नव्हते. त्यामुळे कामे थांबवण्याशिवाय पर्याय नव्हता. आयपीएल सामन्यामुळे वाहतूक पोलीस परवानगी देत नव्हते. त्यामुळे कामास उशीर झाला. सध्या पावसाळा सुरू असल्याने काँक्रीटीकरण शक्य नाही. मात्र वाहन चालकांना त्रास होऊ नये अपघात होऊ नये म्हणून कायम तात्पुरती डागडुजीचे काम सुरू असते. पावसाने उसंत देताच पुन्हा काम सुरू करण्यात येईल. - एस. एम. ठाकरे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग