वाशीतील एपीएमसी घाऊक भाजीपाला बाजारात भाज्यांची आवक वाढली असून दर उतरले आहेत. गुरुवारी एपीएमसीत भाजीपाल्याच्या ६००गाड्या दाखल झाल्या असून उठाव कमी असल्याने दर गडगडले आहेत. आवक वाढल्याने कारली, फरसबी, काकडी, शिमला ,हिरवी मिरच्या दरात प्रतिकिलो १०ते १५ रुपयांनी घसरण झाली आहे.
कांद्याबरोबर इतर भाज्यांचे दर ही आवाक्याच्या बाहेर गेले होते. त्यामुळे गृहिणीचे आर्थिक बजेट कोलमडले होते. मात्र आता भाज्यांचे दर उतरले असल्याने गृहिणींना दिलासा मिळत आहे. मागील आठवड्यात अवकाळी पावसाने पालेभाज्या ,भेंडी, शिमला मिरची, हिरवी मिरची यांच्या दारात वाढ झाली होती. तर दुसरीकडे हिरव्या वाटाण्याचा हंगाम असल्याने वाटाण्याचे दर अवाक्यात होते परंतु आता वाटाण्याचा हंगाम संपुष्टात आला असून वाटण्याचे दर कडाडले आहेत. त्याचबरोबर गवार ही वधारली आहे. घाऊक बाजारात ५३६क्विंटल वाटाणा दाखल होत असून प्रतिकिलो ७० रुपयांवर तर १७१५ क्विंटल गवार आवक असून १०० रुपयांवर विक्री होत आहे.
हेही वाचा >>>३२ महिला स्वच्छताकर्मींच्या पाठीवर कौतुकाची थाप ; उल्लेखनीय कामाचा हिरकणी पुरस्काराने विशेष सन्मान
गुरुवारी एपीएमसी बाजारात ६००गाड्या दाखल झाल्या असून ग्राहक कमी असल्याने भाज्यांना उठाव कमी आहे. त्यामुळे दरात घसरण झाली आहे ,अशी माहिती व्यापारी नाना बोरकर यांनी दिली. ३९३ क्विंटल कारली, ४९० क्विंटल फरसबी, १००१ क्विंटल काकडी, ११०५ क्विंटल शिमला तर ,२३९३ क्विंटल हिरवी मिरची आवक झाली आहे. घाऊक बाजारात प्रतिकिलो भाज्या दर हिरवी मिरची ५६-६० रुपयांवरून ४४-५० रुपये तर कारली ३६-४० रुपयांवरुन १८-२० रुपयांवर फरसबी ४०-४४रु वरुन २४-२६ रुपये, २४-२६रुपयांनी उपलब्ध असलेली काकडी आता १४-१६रुपये तर गवारी ८०रु वरून १०० रुपये आणि हिरवा वाटाणा ७० रुपये दराने विक्री होत आहे .