‘अभय योजने’ला प्रतिसाद मिळत नसल्याने पालिकेची कारवाई; महिनाअखेपर्यंत ६०० कोटींचे लक्ष्यनवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने मालमत्ता कराचे गेल्या वर्षी सहाशे कोटी वसुलीचे लक्ष्य ठेवत आतापर्यंत ४८० कोटींची वसुली केली आहे. मात्र अद्याप १२० कोटी वसुली शिल्लक आहे. थकबाकीदारांना वारंवार अभय योजनेचा लाभ देऊनही वसुली होत नसल्याने अखेर पालिका प्रशासनाने थकबाकीदारांच्या मालमत्तांपुढे ढोल वाजवून वसुली सुरू केली आहे.मालमत्ता कर थकबाकीदारांना करोना कालावधीतील अडचणीच्या परिस्थितीत दिलासा देण्यासाठी १ ऑक्टोबर २०२१ ते २८ फेब्रवारी २०२२ पर्यंत अभय योजना लागू करण्यात आलेली होती. त्यानंतर यात वाढ करीत १५ ते ३१ मार्चपर्यंत विशेष अभय योजना जाहीर करण्यात आली. असे असतानाही थकबाकीदार मालमत्ता कर भरत नसल्याने आता शेवटच्या काही दिवसांत कारवाई सुरू केली आहे. सोमवारी तुर्भे विभागात ढोल वाजवून वसुली करण्यात आली.नवी मुंबई पालिकेचे जीएसटी परतावा व मालमत्ता कर हे उत्पन्नाचे दोन प्रमुख स्रोत आहेत. जीएसटीमधून पालिकेला दरवर्षी १३०० ते १४०० कोटी रुपये शासनाकडून परतावा मिळत आहे. त्यामुळे मालमत्ता करातून जास्तीत जास्त उत्पन्न मिळविण्याचा पालिकेचा प्रयत्न आहे. त्यासाठी लीडार पद्धतीने शहरातील सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण केले जाणार असून या ड्रोन सर्वेक्षणाला नुकतीच केंद्र सरकारने देखील परवानगी दिली आहे. त्यामुळे या सर्वेक्षणानंतर पालिकेच्या मालमत्ता करातून उत्पन्नात वाढ होणार आहे.मागील तीस वर्षांत करण्यात आलेल्या मानवी सर्वेक्षणातून पालिकेने सव्वातीन लाख मालमत्तांचे सर्वेक्षण केले आहे. या मालमत्ता करातून यंदा मार्चअखेर पर्यंत ५५० ते ६०० कोटी रुपये वसुलीचे लक्ष्य पूर्ण केले जाणार आहे. हे लक्ष्य ४८० कोटीपर्यंत पूर्ण करण्यात आले असून येत्या सात दिवसांत आणखी १२० कोटी रुपयांची वसुली करणार आहे.त्या दृष्टीने उर्वरित दिवसात पालिकेने मालमत्ता वसुलीसाठी पालिका आयुक्त अभिजीत बांगर व अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांच्या निर्देशानुसार वेगवान कारवाई सुरू केली आहे. थकीत मालमत्ता कराचा भरणा न केल्यास महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमावलीनुसार मालमत्ता जप्तीची, बँक खाती गोठविण्याची तसेच नळ जोडणी खंडित करण्याची कारवाई करण्यात येत आहे.मालमत्ता कर थकबाकीदार नागरिकांनी आपल्या मालमत्ता करातूनच नवी मुंबई शहरातील विकासकामे होत असल्याचे लक्षात घेत जाहीर केलेल्या विशेष अभय योजनेच्या अंतिम सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा आणि लगेच नवी मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थावर भेट देऊन ७५ टक्के इतक्या मोठय़ा प्रमाणावरील सवलतीच्या दंडात्मक रकमेसह थकीत मालमत्ता कर भरणा करावा असे आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे. नुकत्याच जाहीर केलेल्या अर्थसंकल्पात आगामी वर्षांसाठी पालिकेने ८०० कोटीचे लक्ष ठेवले आहे.तर ३१ मार्चपर्यंत ६०० कोटींचे लक्ष्य ठेवले होते. त्या दृष्टीने पालिकेने मालमत्ता करवसुलीकडे लक्ष दिले आहे. आर्थिक वर्ष संपण्यासाठी मोजकेच दिवस पालिकेच्या हाती असून ६०० कोटींचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.दोन दिवसांत २ कोटींची वसुलीपालिकेने तुर्भे विभागात थकबाकीदारांकडे ढोल वाजवून वसुली व अटकावणी कारवाई केली आहे. ढोल वाजवून वसुलीमुळे तुर्भे विभागात एका दिवसात २ कोटींपेक्षा अधिक वसुली झाल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे.मालमत्ता कर वसुलीसाठी पालिकेने धडक कारवाई सुरू केली आहे. तुर्भे विभागात ढोल वाजवून वसुली तसेच अटकावणीची कारवाई केली जात आहे. या आर्थिक वर्षांत पालिकेचे ६०० कोटी वसुलीचे लक्ष्य आहे. आतापर्यंत ४८० कोटी वसूल झाले आहेत. - सुजाता ढोले, अतिरिक्त आयुक्त, महापालिका