नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर फळांची आवक वाढत आहे. आवक वाढल्याने फळ बाजाराबाहेर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. त्यामुळे एपीएमसी आवाराबाहेर दुपारपर्यंत वाहतूक कोंडी होती. हेही वाचा - नवी मुंबई : १ महिन्यात ७० टक्के परताव्याचे आमिष; ५ लाखांचा फटका हेही वाचा - नवी मुंबई स्वच्छ करण्याचे श्रेय कचरावेचक भगिनींना जाते – आयुक्त राजेश नार्वेकर सध्या उन्हाचा पारा चढत असल्याने रसदार फळांची मागणी वाढत आहे. त्यामुळे एपीएमसी फळ बाजारात कलिंगड, टरबूज, पपई अशा फळांची आवक वाढली आहे. तसेच रमजान निमित्ताने या फळांना अधिक मागणी असते, त्यामुळे सध्या बाजारात फळांची आवक वाढत आहे. गुरुवारी फळ बाजारात एकूण ४८३ गाड्या आवक झाली होती. यात सर्वाधिक कलिंगडाची आवक होती. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने बाजार आवारात जागा कमी पडत होती, त्यामुळे बाजार आवाराबाहेर गाड्यांची लांबच लांब रांग लागली होती. या वाहनांच्या गर्दीने वाशी-तुर्भेकडे जाणाऱ्या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती.