उरण : केंद्र सरकारने २९ कामगार कायदे रद्द करून ४ कामगार श्रम संहिता लागू करण्याचा निर्णय घेतला असून या विरोधात देशातील प्रमुख कामगार संघटनांनी २८ व २९ मार्चला कामगारांचा संप जाहीर केला होता. या निमित्ताने उरणमधील औद्योगिक क्षेत्रात संप पुकारला ह?ता. या संपामध्ये सरकारी कर्मचारी, बँक, पोस्ट व वीज कर्मचारी सहभागी झाले होते.या संपाच्या निमित्ताने सीआयटीयु कामगार संघटनेने उरण शहरातून मिरवणूक करण्यात आली होती. उरणच्या चारफाटा येथून ही कामगारांची मिरवणूक काढण्यात आली. या वेळी कामगार विरोधी कामगार संहिता रद्द करा, खासगीकरण रद्द करा, महागाई कमी करा, कामगार एकजुटीचा विजय असो आदी घोषणा कामगारांनी देत चारफाटा, पालवी रुग्णालय, खिडकोळी नाका, जरी मरी मंदिर असा मोर्चा काढला. गांधी चौकात मोर्चा आल्यानंतर त्यामध्ये सभेसमोर सीआयटीयुचे नेते कॉम्रेड भूषण पाटील, किसान नेते संजय ठाकूर, नगरपालिका नेते संतोष पवार, भरतराज थळी यांनी भाषणे केली .या संपात उरण तहसीलमधील कर्मचारी सहभागी झाल्याने कामकाज बंद होते. या संपात सर्व कर्मचारी सहभागी झाले असल्याची माहिती उरणचे तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांनी दिली. यामध्ये वीज कामगारांनी सहभाग घेतला होता. तसेच उरणमधील राष्ट्रीय बँकांमधील कर्मचारीही सहभागी झाले होते.