ग्राहकांना नाहक आर्थिक फटका नवी मुंबई : एपीएमसी बाजारात अचानक झालेल्या कामबंद आंदोलनाने किरकोळ बाजारात कांदा पोहोचत नसल्याने त्याचा आर्थिक फटका मात्र किरकोळ ग्राहकांना बसत आहे. बाजारात सोमवारी आणि मंगळवारी कांद्याचे दर तेजीत होते. घाऊक बाजारात २५-३३ रुपये दराने उपलब्ध असलेले कांदे किरकोळ बाजारात आधी ४० प्रति किलो रुपये दराने उपलब्ध असलेल्या कांद्याची या दोन दिवसांत ५० रुपयांनी विक्री झाली. एपीएमसी कांदा बटाटा बाजार समिती शनिवारी शिवजयंतीनिमित्ताने बंद होती. तर रविवारी बाजार समिती बंदच असते. परंतु अचानक माथाडी कामगारांनी कामबंद आंदोलन केले होते. त्यामुळे बाजारात आलेल्या ३०० गाडय़ा उभ्याच होत्या.दिवसभर गाडय़ा खाली न केल्याने घाऊक ग्राहकांना त्या दिवशी खरेदी करता आली नाही. सायंकाळी उशिराने माथाडी कामगारांनी गाडय़ा खाली करण्याचे काम सुरू केले. मात्र तोपर्यंत बाजारात ग्राहक उपस्थित नव्हता. त्यामुळे या तीन दिवसांत एपीएमसी बाजारातून किरकोळ विक्रेत्यांना कांद्याची खरेदी करता आली नाही. त्यामुळे किरकोळ बाजारात कांद्याची कमतरता भासत होती. परिणामी दरवाढ करण्यात आली. आधी ४० रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत असणाऱ्या कांद्याने प्रतिकिलो पन्नाशी गाठली होती. बाजारातील बंदच नाहक आर्थिक फटका मात्र आता किरकोळ ग्राहकांनादेखील बसत आहे.