मुंबई कृषी उत्पन्न धान्य बाजारात सोमवारी पहाटे सहा वाजता ए विंग लगत असलेल्या स्टॉलला भीषण आग लागली होती. आगीत स्टॉलचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामध्ये सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही, परंतु फळ बाजारानंतर पुन्हा धान्य बाजारात लागलेल्या आगीने एपीएमसी मधील अग्नि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा निर्माण झाला आहे. दोन आठवड्यांपूर्वी फळ बाजारात मोठ्या प्रमाणावर आगीची घटना घडली होती. यामध्ये १० ते १५ गाळे आगीच्या भक्षस्थानी सापडले होते तर बहुतांश गाळ्यांचे नुकसान झाले होते. ही घटना ताजी असतानाच आज सोमवारी पुन्हा धान्य बाजारात ए विंग लगत असलेल्या पत्र्याच्या स्टॉलला भीषण आग लागली . ही आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. या स्टॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पिशव्यांचा साठा असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे आगीने आणखीन पेट घेतल्याने स्टॉल जळून खाक झाला आहे. हेही वाचा: उरण : सततच्या आगींमुळे उरणमधील वनसंपदा व सजीव सृष्टीचे होतेय नुकसान आगीची घटना समजतात महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाची एक गाडी घटनास्थळी दाखल होऊन विझवण्यात आली. परंतु या आगीने पुन्हा एपीएमसी आवारातील अग्नीसुरक्षा उपयोजनांकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचे निदर्शनास येत आहे. एपीएमसीतील अग्नीसुरक्षा वाऱ्यावर असून या ठिकाणी मोठी दुर्घटना घडल्यास येथील व्यापारी माथाडी कर्मचारी तसेच ग्राहक यांच्या जीवावर बेतण्याची शक्यता नाकारता येत नाही.