नवी मुंबई महापालिकेने शहरातील रस्त्यावर बसणारे फेरीवाले संख्या कमी करण्यासाठी फेरीवाले धोरणाअंतर्गत शहरात ठीकठिकाणी विविध सोयी सुविधांयुक्त भाजी मंडई उभारण्यात आलेल्या आहेत. कोपरखैरणे से.२ , से.८ येथील भाजी मंडई सुरु करण्यात आलेल्या आहेत. से १५ येथील भाजी मंडईचे बांधकाम सुरू आहे. मात्र से.६ येथील ही भाजी मंडईचे काम पूर्ण झाले असूनही त्या ठिकाणी मंडईचा वापर होत नसल्याने ही जागा वापराविना ओस पडली आहे. हेही वाचा- नेरुळमध्ये शिवाजी चौकाचा कायापालट; सिंहासनारुढ शिवरायांच्या पुतळ्याचे आकर्षण, मावळ्यांचा देखावाही जोडीला.. गेल्या काही वर्षांपासून शहरातील फेरीवाले संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. करोनानंतर हे प्रमाण अधिक वाढले आहे. त्यामुळे अनेकदा फूटपाथ, रस्त्यावरच फेरीवाल्यांकडून भाजीपाला मंडई वसवली जाते. त्यामुळे पादचाऱ्यांना त्रास होतो . शिवाय वाहन चालकांनाही वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. तसेच मुख्य रस्यावर , पदपथावरील फेरीवाल्यामुळे अस्वच्छता पसरते. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने प्रत्येक विभागातील सेक्टर मध्ये भाजीपाला मंडई बांधून देण्यात आलेली आहे. त्यापैकी बऱ्याच मंडई या सुस्थितीत असून त्याचा चांगला उपयोगही होताना दिसत आहे. कोपरखैरणे सेक्टर ६ येथील भाजीपाला मंडई मात्र कोणताही वापर नसल्याने धुळखात पडून आहे. येथील फेरीवाले याठिकाणी न बसता रस्त्यावरच बसत आहेत . एवढे लाखो रुपये खर्च करून ही भाजी मंडई उभारण्यात आलेली आहे. मात्र त्या ठिकाणी भाजी मंडईचा कोणताही उपयोग होत नसल्याने मंडईची अडगळ स्थिती झालेली आहे.