नवी मुंबई : मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेल्या वाशी खाडी पुलावरील वाहतूककोंडीतून सुटका होण्यासाठी बहुचर्चित तिसऱ्या वाशी खाडीपुलाचे काम वेगात चालू असून या नव्या पुलाचे काम ३२ टक्के पूर्ण झाले आहे. तर या पुलाच्या पूर्णत्वासाठी ऑगस्ट २०२४ म्हणजेच आणखी दोन वर्ष लागणार आहे.बहुचर्चित तिसऱ्या पुलाच्या निर्मितीसाठी वेगवान काम सुरु असून एल अँन्ड टी कंपनी वेगाने काम करत आहे.सध्या खाडीपुलावरील तिसऱ्या पुलाचे काम सुरु असल्याने सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या पुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होते.या पुलाच्या कामासाठी टोलनाक्यावरील काही टोललेन बंद करण्यात आल्या आहेत.त्यामुळे वाहतूक कोंडी होते. वाशी खाडीपुल ओलांडताना होणाऱ्या वाहतूककोंडीतून नागरीकांची सुटका या पुलाच्या पूर्णत्वानंतर होणार आहे.

परंतू त्यासाठी २०२४ पर्यंत प्रतिक्षा करावी लागणार आहे.देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या वाशी खाडीपुलावरील पहिला पुल मुंबईकडून नवी मुंबईकडे येणाऱ्या वाहनांसाठी बंदच आहे. तर दुसरा खाडीपुल सध्या वाहतूकीसाठी वापरण्यात येत आहे. दुसऱ्या खाडीपुलावर मुंबईकडे जाण्यासाठी ३ तर मुंबईहून पुण्याकडे जाण्यासाठी ३ लेन आहेत.परंतू सातत्याने वाढणारी वाहनांची संख्या यामुळे दुसऱ्या वाशी खाडीपुलावर नेहमी वाहतूक कोंडी होत असते. तिसऱ्या पुलाच्या संपूर्ण प्रकल्पासाठी ७७५ कोटी खर्च येणार असून या पुलाच्या ५५९ कोटीच्या निर्मितीचे काम एल अँन्ड टी कंपनी करत आहे. नव्याने तयार करण्यात येत असलेल्या तिसऱ्या पुलाच्या कामात वाशी खाडी पुलावर पुण्याहून मुंबईच्या दिशेकडे जाणारा एक व मुंबईहून पुण्याकडे जाणारा एक अशा दोन्ही बाजुला उड्डाणपुल बांधण्यात येत आहेत.

हेही वाचा : नवी मुंबई : माथाडी कामगारांचे प्रलंबित प्रश्न महिन्यातभरात सोडविणार ; राज्य कामगार मंत्री सुरेश खाडे यांचे आश्वासन

दोन्ही दिशेकडे तयार करण्यात येणाऱ्या पुलावर प्रत्येकी तीन तीन लेन वाढणार आहे.त्यामुळे आता असलेल्या सुविधेपेक्षा दुप्पट वाहतूक भविष्यात होऊ शकणार आहे.त्यामुळे तिसऱ्या खाडी पुलाच्या काम वेगात सुरु असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे. नवी मुंबईच्या दिशेने व पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची सध्याच्या दुसऱ्या पुलावर सातत्याने वाहतूक कोंडी होते. दुसर्‍या खाडीपुलावर डांबरीकरणाचे व दिवाबत्तीचे कामही करण्यात आले आहे. तिसऱ्या खाडीपुलाचे काम आता वेगाने सुरु असल्याची माहिती एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिली.

ठेकेदाराला ३ वर्ष कामाची मुदत….

वाशी खाडीपुलावरील महत्त्वपूर्ण असलेल्या तिसऱ्या खाडी पुलाचे काम सुरु असून या पुलाच्या निर्मितीसाठी ऑगस्ट २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. – एस.एस. जगताप कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ

टोलनाक्यामध्येही वाढ होणार …..

सध्या दुसऱ्या खाडी पुलावर मुंबईकडे व पुण्याकडे जाणाऱ्या दोन्ही मार्गावर टोलवसुली केली जाते.परंतू तिसऱ्या पुलाची निर्मिती झाल्यानंतर तिसऱ्या पुलाच्या दोन्ही बाजुला अतिरिक्त तीन तीन लेन टोलवसुलीसाठी तयार करण्यात येत आहेत.त्यामुळे या नव्याने होणाऱ्या पुलावरही टोलनाके बनवण्यात येणार आहेत.तर मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गावरील टोलनाका वाशी गावाच्या दिशेने पुढे होणार आहे.

हेही वाचा : नवी मुंबई : शहरात ४०,४७२ घरे पाणीमीटरच्या कक्षेत आल्याने १ कोटी वसुली वाढणार !

वाहने येण्याजाण्याची क्षमता दुपटीने वाढणार……

वाशी खाडी पुलावरील दुसऱ्या पुलावर येण्याजाण्यासाठी तीन तीन लेन आहेत.परंतू तिसरा पुल झाल्यानंतर अतिरिक्त ६ लेन तयार होणार असल्याने आतापेक्षा दुप्पट वाहने एकावेळी जाऊ शकणार असल्याने सततच्या वाहतूककोंडीतून वाहनचालकांची सुटका होईल असे अपेक्षित आहे.

असा आहे तिसऱा पुल…

नव्याने निर्माण होणार तिसऱ्या खाडी पुलाचे दोन भाग असून सध्या सुरु असलेल्या दुसऱ्या पुलाच्या रेल्वे पुलाकडील दिशेला एक व जुन्या खाडी पुलाकडील पहिल्या पुलाच्या बाजुला एक असे ३ पदरी दोन उड्डाणपुल असणार आहेत.हे दोन्ही पुल १८३७ मीटर लांब व १२.७० मीटर रुंद असणार आहेत.