नवी मुंबई : केंद्र सरकारने अन ब्रॅण्डेड जीवनावश्यक खाद्यपदार्थावर ५ टक्के वस्तू व सेवा कर लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयाला देशभरातील व्यापारी विरोध दर्शवीत असून हा निर्णय मागे घेण्यासाठी १६ जुलै रोजी देशव्यापी बंद पुकारण्यात आलेला आहे. या बंदला नवी मुंबईतील व्यापारी संघटनांनीही पाठिंबा दर्शविला असून हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

१८ जुलैपासून जीएसटीचा निर्णय देशभरात लागू करण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. याला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे. नवी मुंबईतील ग्रेन, राइस अँड ऑइलसीड्स मर्चंट्स असोसिएशन (ग्रोमा) आणि चेंबर ऑफ असोसिएशन ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अँड ट्रेडर्स यांनी या लाक्षणिक संपात सहभागी होत असल्याची माहिती पत्रकार परिषदेत दिली आहे.

एपीएमसीतील ग्रोमा हाऊसमध्ये गुरुवारी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट करीत या वस्तू-सेवा करामुळे महागाई वाढून त्याचा फटका सर्वसामान्यांना बसणार आहे. त्यामुळे हा कर मागे घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

सरकारच्या या निर्णयामुळे ७,३०० बाजारपेठा आणि १३,००० डाळ गिरण्या, १६०० तांदूळ गिरण्या, ८००० पिठाच्या गिरण्यांसह ३ कोटी छोटय़ा-मोठय़ा

व्यापाऱ्यांना फटका बसणार आहे, असे  धान्य, तांदूळ व तेलबिया व्यापारी संघाचे (ग्रोमा) अध्यक्ष शरदकुमार मारू यांनी सांगितले.