पोलिसांकडून कारवाईचा बडगा; कोंडी, पार्किंगच्या समस्या ‘जैसे थे’ नवी मुंबई : शहरात १ तारखेपासून वाहतूक विभागाने विशेष मोहिमा राबवत वाहतूक नियमांचे उलंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र त्यामुळे वाहतूक कोंडी, बेकायदा पार्किंग या मुख्य समस्या तशाच आहेत. सिग्नलवर उभा राहून कारवाई करण्याऐवजी वाशी, कोपरखैरणे, एपीएमसी अशा ठिकाणी बेशिस्त वाहनचालकांवर कठोर कारवाईची निकड असल्याचा सर्वसामन्यांचा सूर आहे. नवी मुंबईत १ ते २२ नोव्हेंबरदरम्यान वाहतूक पोलिसांनी विनाहेल्मेट, सिग्नल तोडणे, सिग्नलवरील झेब्रा क्रॉसवर गाडी थांबवणे याविरोधात दोन हजारांहून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली. मात्र शहरातील बेशिस्त पार्किंग आणि त्यामुळे होणारी वाहतूक कोंडी यावर कठोर आणि ठोस उपाययोजना करण्यात येत नाही. १ तारखेपासून शहरातील सर्व चौकांत पाम बीच, ठाणे-बेलापूर आणि शीव-पनवेल महामार्गावर पोलिसांनी विनाहेल्मेट व सिग्नल तोडणाऱ्यांवर कारवाई केली. ही कारवाई करत असताना एकीकडे पोलिसांचे पथक कारवाई करीत होते तर दुसरीकडे वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष करीत होते. याबाबत जाब विचारणाऱ्या शीतल देशमुख या महिला दुचाकी स्वाराला ‘आम्हाला साहेबांनी सांगितलेले कर्तव्य बजावत आहोत’ हे उत्तर देण्यात आले. पाम बीचवरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना तीन ठिकाणी सिग्नलवर अडवण्यात येत होते. त्यामुळे एकाच प्रकारची कागदपत्रे तीन ठिकाणी दाखवण्याची वेळ वाहनचालकांवर आली. त्यामुळे वाहतूक कोंडी अनेकांना होऊन कार्यालयात जाताना उशीर झाल्याचे कि शोर पत्की यांनी सांगितले. दरम्यान, एपीएमसी, वाशी कोपरखैरणे मार्गावर सेक्टर ९/१०, १५/१६ वाशी डी- मार्ट चौक सेक्टर- ७ चा नाका, तीन टाकी, कोपरखैरणे रेल्वे स्थानक परिसर, दिवा नाका, रबाळे एमआयडीसी पोलीस ठाणेसमोर एल पॉइंट, उरण फाटा ते किल्ले गावठाण, पनवेल बस स्थानक रेल्वे स्टेशन आदी ठिकाणी होणाऱ्या बेशिस्त पार्किंग व वाहतूक कोंडीकडे दुर्लक्ष होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. वाहतूक कोंडीवर कारवाई नियमित सुरू असते. खास करून कोपरखैरणे व एपीएमसी आणि पनवेलमधील वाहतूक कोंडी वारंवार होणाऱ्या ठिकाणी येत्या काही दिवसांत विशेष मोहीम हाती घेऊन कारवाई करण्यात येईल. - पुरुषोत्तम कराड, पोलीस उपायुक्त, वाहतूक विभाग