नवी मुंबई: राज्यात सर्वात श्रीमंत महानगर पालिकेपैकी एक असलेल्या नवी मुंबईतील विभाग कार्यालयात दोन संगणकांचे महत्वाचे भाग चोरीता गेले आहेत. विशेष म्हणजे सीसीटीव्हीत पाहिल्यावर एक युवक सर्वांच्या समक्ष आला आणि कर्मचाऱ्यांच्या समोर असलेले संगणक उघडले व आतील भाग घेऊन गेला. मात्र त्या अनोळखी युवकाची चौकशी करण्याची साधी तसदीसुद्धा कोणी घेतली नाही. या घडल्या प्रकाराने ठेवलेल्या सुरक्षा रक्षकाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. कोपरखैरणे विभाग अधिकाऱ्याच्या काचेच्या दालना बाहेर ही घटना ५ तारखेला घडली व ९ तारखेला उजेडात आली आहे. या बाबत गुन्हा नोंद केल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली. ५ तारखेला एक युवक कोपरखैरणे विभाग कार्यालयाच्या पहिल्या मजल्यावर आला व त्याने हातातील सॅक एका टेबलवर ठेवली व सॅक मधील संगणक उघडण्याची हत्यारे बाहेर काढली. नंतर त्याने एक संगणक उघडला व त्यातील काही भाग काढून आपल्या सॅकमध्ये ठेवले व त्यानंतर तो बाहेर पडला व दुसऱ्या मजल्यावर मालमत्ता विभागात जाऊन त्याने हेच कृत्य केले. ९ तारखेला संगणक चालत का नाही हे पाहण्यासाठी नेहमीचा हार्डवेअर इंजिनिअरला बोलावून पाहणी केली असता आतील महत्वाचे भाग नसल्याचे निदर्शनास आले. हेही वाचा: नवी मुंबई: वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा; ७ महिन्यात ५ हजारांहून अधिक बेशिस्त वाहनांवर कारवाई त्यामुळे सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पूर्ण प्रकार समोर आला आणि प्रत्येकजण एकमेकांना दोष देऊ लागला अशी माहिती समोर आली आहे. त्या चोरट्याने २० हजार रुपये किमतीचे ३ डेल कंपनीचे प्रोसेसर चोरी केले. विभाग कार्यालयाच्या प्रत्येक विभागाच्या दरवाजात सुरक्षा रक्षक असतो मात्र त्याचा जाच सर्वसामान्यांनाच जास्त होतो. अधिकारी व कर्मचारी यांच्या ऐवजी सुरक्षारक्षकच उत्तरे देऊन नागरिकांना पिटाळण्यात धन्यता मानतात अशी प्रतिक्रिया एका नागरिकाने दिली. या बाबत प्रत्यक्ष जाऊन अधिकारी कर्मचारी यांच्याशी चौकशी केली असता ५ तारखेला पंतप्रधान योजेनेअंतर्गत फेरीवाला कर्ज वाटपाची गर्दी होती त्याचा गैरफायदा घेतला गेला असे उतर दिले.