ठाणे-बेलापूर मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार

ठाणे-बेलापूर मार्गावर तीन ठिकाणी उड्डाण पुलाचे काम होत असून ते नववर्षांत पूर्णत्वास जाणार असल्याने या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे. दिघा येथील अरुंद रस्ता, घणसोली येथील तळवली नाका व सविता केमिकल या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक हैराण झाले होते.  ठाणे-बेलापूर मार्गावरील दिघा येथे रस्त्यांच्या रुंदंीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या दुकानांमुळे रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम रखडले होते. या रखडलेल्या कामामुळे दररोज या ठिकाणी वाहतूक कोंडी होत होत असल्याने वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. अनेकदा अरुंद रस्त्यामुळे अपघात होऊन अनेकांचा जीवदेखील गेला आहे. पण महानगरपालिकेने रस्त्यांच्या रुंदीकरणामध्ये अडथळा ठरणाऱ्या दुकानांचे पुनर्वसन पालिकेच्या ओएस प्लॉटवर केले असून दिघा येथील अंरुद रस्त्याचे काम मार्गी लागणार आहे.

घणसोली नाका परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी होत असल्याने या ठिकाणी उड्डाण पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे १.४ किलोमीटर लांबीचा उड्डाण पूल बांधण्यात येणार असून त्याचे काम प्रगतिप्रथावर आहे. सविता केमिकल येथेही उड्डाण पुलाचे काम सुरू असून तेही यंदा पूर्ण होईल.

मार्चच्या पहिल्या आठवडय़ात विमानतळ कामांचे उड्डाण

विकास महाडिक, नवी मुंबई</p>

नवी मुंबईतील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळच्या उभारणीसाठी लागणारा मातीचा भराव व टेकडीकपात यासारख्या कामांची पाच जानेवारी रोजी निविदा प्रसिद्ध होत असून मार्चच्या पहिल्या आठवडय़ात या कामांचे खऱ्या अर्थाने उड्डाण होणार आहे. चार निविदाकरांपैकी एक निविदाकार जूनमध्ये निविदा प्रस्ताव सादर करणार असल्याने सिडकोच्या कामानंतर विमानतळ उभारणाऱ्या खासगी कंपनीच्याही कामाला याच वर्षी जूनमध्ये सुरुवात होणार आहे. ऑक्टोबर २०१९ रोजी या विमानतळावरुन विमानांचे उड्डाण करण्याचे लक्ष्य सिडकोने आखले आहे.

गेली १८ वर्षे चर्चेत असलेल्या नवी मुंबई विमानतळ प्रकल्पातील सर्व अडथळे दूर झाले असून यावर्षी विमानतळाच्या कामांचा शुभारंभ होणार आहे. प्रकल्पग्रस्तांचे पुनवर्सन व पुनस्र्थापनेची जवळपास तयारी होत आली असून या कामाचांही शुभारंभ या वर्षी होण्याची शक्यता आहे. नवी दिल्लीत  बुधवारी झालेल्या नागरी उड्डाण मंत्रालयाच्या बैठकीत राज्य शासनाने सादर केलेल्या पात्रता प्रस्तावावर तब्बल चार तास चर्चा झाली. येत्या काही दिवसांत या प्रस्तावाला नागरी विमान उड्डाण मंत्रालयाची परवानगी मिळणार असून सिडकोने आपल्या कामांना सुरुवात करण्याचा निर्णय घेतला आहे. पात्रता निविदेसाठी जीएमआर, जीव्हीके, टाटा, आणि हिरानंदानी सारख्या बडय़ा बांधकाम कंपन्यामध्ये स्पर्धा आहे. ही निविदा प्रक्रिया केंद्र व राज्य सरकारच्या मंजूरीनंतर जूनपर्यंत होण्याची शक्यता आहे. त्यापूर्वी सिडको आपली कामे सुरू करणार असून या प्रकल्पाला अडसर ठरु पाहणाऱ्या ओवळा टेकडीच्या कामाची निविदा पाच जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. निविदेचे हे सोपस्कर पूर्ण करण्यासाठी दोन महिन्यांचा कालावधी जाण्याची शक्यता असून मार्चच्या पहिल्या आठवडय़ात या कामाला प्रत्यक्षात सुरुवात होईल. विमानतळासाठी एकूण दोन हजार ६८ हेक्टर जमीन लागणार असून एकूण पंधरा हजार कोटी रुपये खर्च होणार आहे. या प्रकल्पासाठी संपादीत करण्यात आलेल्या एकूण जमिनीपैकी  १ हजार १८० हेक्टर जमिनीवर प्रत्यक्षात धावपट्टय़ा असतील. या नियोजित धावपट्टय़ांवर मातीचा भराव करण्याचे आव्हानात्मक काम सिडकोसमोर असून ते कामही मार्चमध्ये सुरू होणार आहे. या कामावर सिडको सुमारे अठराशे कोटी रुपये खर्च करणार असून विमानतळ उभारणीत या कामांना मोठे महत्त्व आहे.

पनवेलकरांना भरभरून देणार

संतोष सावंत, पनवेल</p>

रखडलेले अनेक सरकारी प्रकल्प लवकरच पूर्ण होणार असल्याने येते नववर्ष पनवेलकरांना भरभरून देणार आहे. पनवेल नगर परिषदेचे रूपांतर महानगरपालिकेमध्ये याच वर्षांत होत आहे. महानगरपालिकेप्रमाणे पनवेलकरांना सरकारी दरात वैद्यकीय उपचार मिळावे म्हणून चार वर्षांपासून बांधकाम व प्रशासकीय अडचणींमध्ये अडकलेल्या जिल्हा ग्रामीण रुग्णालयाचे काम याच २०१६ मध्ये पूर्ण होऊन येथे सामान्यांना उपचार घेता येतील. ट्रामा सेंटर हे या १२० खाटांच्या रुग्णालयाचे वैशिष्टय़ असेल.

गेल्या ३० वर्षांपासून तळोजा औद्योगिक वसाहत ते रेल्वेस्थानक जोडणारी एकही बससेवा नव्हती, नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमातर्फे (एनएमएमटी) जानेवारीत ही सेवा सुरू होत आहे. एनएमएमटीची पनवेल रेल्वेस्थानक ते करंजाडे ही बससेवाही जानेवारीत सुरू करण्याच्या वाटेवर आहे. पनवेलमधील विविध प्रशासकीय यंत्रणांना एकाच छताखाली हक्काची जागा मिळावी, यासाठी बांधण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीचे काम यंदाच पूर्ण होत असल्याने नागरिकांना सरकारी कामांसाठी विविध ठिकाणी खेटे मारावे लागणार नाहीत. प्रशासकीय यंत्रणाच्या कार्यालयाप्रमाणे पनवेलचे सत्र न्यायालय अलिबाग येथे होते. हेच अलिबागमधील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले होते. २०१६ मधील महाराष्ट्र दिनावेळी पनवेलचे अतिरिक्त सत्र न्यायालयाचे कामकाज सुरू होईल असे चित्र आहे. याच वर्षी मुंबई-गोवा महामार्गावरील पळस्पे ते पेण या पहिल्या टप्प्यातील काही ठिकाणी रखडलेले काम २०१६ मध्ये मार्गी लागेल.  ’ सरकारने संधू समितीचा प्रस्ताव स्वीकारल्यास सामान्य आदिवासींना जमिनीच्या मोबदल्यात आर्थिक लाभ होईलच, पण भविष्यात त्यांच्या नावापुढे विकासक म्हणून नाव लागेल. पनवेल तालुक्यात १० टक्के जमिनी आदिवासींच्या आहेत.

’ पनवेलचे ग्रामीण रुग्णालयाच्या दोन मजली इमारतीचे काम डिसेंबर २०१६ पर्यंत पूर्ण होईल. १३ कोटी रुपये खर्च करून गेल्या चार वर्षांपासून १०० खाटा व ट्रामा सेंटरमधील २० खाटा अशा एकूण १२० खाटांचे हे अद्ययावत सुसज्ज रुग्णालय पनवेल शहरात होणार आहे. विविध आजारांवर सुमारे २२ तज्ज्ञ डॉक्टर, १२५ कर्मचाऱ्यांच्या साहाय्याने येथे २४ तास वैद्यकीय सेवा पुरविली जाईल. तसेच हृदयावरील शस्त्रक्रिया, डायलेसिस यावर येथे उपचार होतील.

’ पनवेलमधील विविध प्रशासकीय कार्यालयांच्या इमारतीचे बांधकाम मार्च २०१६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. या इमारतीत शहर पोलीस ठाणे व सुमारे १२ सरकारी कार्यालये असतील. अतिरिक्त सत्र न्यायालयाचे बांधकाम पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.

करंजा परिसरातील पाणीसमस्या दूर होणारजगदीश तांडेल, उरण

अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर वसलेल्या उरण तालुक्यातील करंजा परिसरातील सात गावांतील दहा हजारांपेक्षा अधिक नागरिकांना स्वातंत्र्यपूर्व काळापासून पिण्याच्या पाण्याच्या समस्येने ग्रासलेले आहे. येथे पंधरा दिवसांतून एकदा पाणी येत असल्याने साठवून ठेवलेल्या पाण्यामुळे रोगराईलाही सामोरे जावे लागत आहे. ही समस्या दूर करण्यासाठी सिडकोने हेटवणे धरणाच्या जलवाहिनीवरून तीन किलोमीटर अंतरावरून जलवाहिनी टाकली असून ८२ लाखांची ही योजना २०१६च्या पहिल्या महिन्यापासूनच सुरू होणार आहे. सिडकोच्या अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. नव्या वर्षांत करंजा परिसरातील पाणीसमस्या दूर होणार असल्याने ग्रामस्थांकडूनही आनंद व्यक्त होत आहे.

चाणजे या सर्वात मोठय़ा ग्रामपंचायतीत मोडणाऱ्या करंजामधील सात पाडय़ांत पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे दूषित पाण्यामुळे होणारे साथीचे आजार होतात. करंजा विभागात मच्छीमार समाज मोठय़ा संख्येने राहत असल्याने स्त्री, पुरुष, मुले या सर्वानाच काम करावे लागते. मात्र पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत असल्याने उत्पन्नावरही पाणी सोडण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर येत होती. रायगड जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून पाण्याच्या आतापर्यंत जवळपास सहा कोटींच्या योजना राबविण्यात आल्याची माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सीताराम नाखवा यांनी दिली. यापैकी काही योजना काही काळ टिकल्या, मात्र त्यानंतर ये रे माझ्या मागल्या म्हणत पुन्हा पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ येथील ग्रामस्थांवर आली. त्यामुळे माजी आमदार विवेक पाटील यांनी करंजा परिसराला सिडकोच्या माध्यमातून टँकरने पाणीपुरवठा करण्याची व्यवस्था करून घेतली. तसेच या परिसराचा कायमस्वरूपी प्रश्न सुटावा याकरिता सिडकोकडे पाणीपुरवठा योजनेची मागणी केली. त्यानुसार दोन वर्षांपूर्वी सिडकोने तीन किलोमीटर व आठ इंच व्यासाची जलवाहिनी असलेली ८२ लाखांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली. हेटवणे धरणातील पाणीसाठा पाहून जानेवारीत ही योजना सुरू केली जाईल, असे सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाचे अधीक्षक अभियंता रमेश गिरी यांनी दिली.