५२ हजार ५३४ वाहनांवर कारवाई;एक कोटीपेक्षा अधिकचा दंड वसूल

नवी मुंबई : बेशिस्त वाहन पार्किंग ही शहरात वाहतूक कोंडी होण्याचे एक मोठे कारण असून यावर वाहतूक पोलीस सातत्याने कारवाई करीत आहेत. वर्षभरात ५२ हजार ५३४ वाहनांवर बेकायदा पार्किंग केल्याने कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून दंडापोटी १ कोटी ५ लाख ६ हजार ८०० रुपये वसूल केले आहेत. नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात वाहतूक कोंडी ही एक समस्या बिकट होत आहे. वाढती वाहनसंख्या वा वाहने उभी करण्यासाठी नसलेल्या वाहनतळांमुळे वाहतूक कोंडी होत आहे. तसेच  वाहनचालकांचा बेशिस्तपणा हाही वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहे.

वाहनचालक वाहने कुठेही उभी करीत असल्याने शहरात वाहतुकीला मोठा अडथळा ठरत आहे. वाशी महापालिका रुग्णालय वाशी, घणसोली, ऐरोली, कोपरखैरणे या पालिकेच्या विभाग कार्यालयांसमोरही ‘नो पार्किंग’मध्ये वाहने उभी असतात.

बेकायदा पार्किंग केल्याने वर्षभरात पोलिसानी ५२ हजार ५३४ वाहनांवर कारवाई केली आहे. यावरून   वाहनचालकांचा हा बेशिस्तपणा किती मोठय़ा प्रमाणात सुरू आहे, हे दिसून येते.

तुर्भे, उरणमध्ये सर्वाधिक कारवाई

५२ हजार ५३४ वाहनांवर बेकायदा पार्किंग केल्याने कारवाई करण्यात आली आहे. यासाठी दंडापोटी १ कोटी ५ लाख ६ हजार ८०० रुपये वसुल करण्यात आले आहेत. यात परिमंडळ एकमध्ये तुर्भे अग्रस्थानी असून या ठिकाणी ९ हजार ५०४ कारवाई केल्या, तर सर्वात कमी कारवाई कोपरखैरणेत करण्यात आल्या असून त्या केवळ ८७ आहेत. परिमंडळ दोनमध्ये सर्वाधिक कारवाई उरणमध्ये ७ हजार ३९५ झाल्या असून सर्वात कमी नवी पनवेलमध्ये केवळ ३२८ कारवाई करण्यात आल्या आहेत.