उरण : भुयारी मार्ग असलेल्या उरण व द्रोणागिरी या स्थानकांतील मार्गात यावर्षीही पावसाळ्यात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे येथील प्रवाशांवर पाण्यातून मार्गक्रमण करीत प्रवास करण्याची वेळ येणार आहे. मात्र ही समस्या कायमस्वरूपी असल्याने स्थानकात पाणी उपसा यंत्र बसविण्यात आले असल्याची माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.
उरण ते नेरुळ/ बेलापूर या लोकल मार्गावरील उरण व द्रोणागिरी या दोन्ही स्थानकांत ये-जा करण्यासाठी भुयारी मार्गाचा वापर करावा लागत आहे. मात्र पाऊस आणि समुद्राच्या भरतीच्या पाण्यामुळे भुयारी मार्गात दीड ते दोन फूट पाणी साचते. पंधरा महिन्यांपूर्वी ही लोकल सुरू झाली आहे. ही लोकल सुरू झाल्याने उरण नवी मुंबई आणि मुंबईला लोकलने जोडला गेला आहे. त्यामुळे येथील विद्यार्थी, चाकरमानी आणि सामान्य प्रवाशांना याचा फायदा झाला आहे. मात्र या सेवेनतेरही येथील प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करीत प्रवास करावा लागत आहे.
उरण ते खारकोपर दरम्यानची उरण आणि द्रोणागिरी ही दोन स्थानकावर ये-जा करण्यासाठी भुयारी मार्ग आहेत. ही स्थानके उभारण्यात आल्यानंतर उद्घाटनापूर्वी पहिल्याच पावसात पाच फूट पाणी साचल्याने येथील तरुणांनी या पाण्यात पोहण्याचा आनंद लुटला होता. त्यानंतर याची दखल घेत रेल्वेने या दोन्ही स्थानकात कायमस्वरूपी पाणी उपसा करणारे पंप बसविले आहेत. असे असतांनाही या दोन्ही स्थानकात जोरदार पावसानंतर पाणी सचण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरील लोकलच्या प्रवाशांना या पाण्यातून प्रवास करावा लागत आहे.
उरण आणि द्रोणागिरी स्थानकाच्या भुयारी मार्गात पावसाचे पाणी साचत आहे. या स्थानकात सचणारे पाणी उपसा करण्यासाठी कायमस्वरूपी पंप बसविण्यात आले आहेत. – प्रवीण पाटील, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे