उरण : पावसाळ्यात धोकादायक इमारत कोसळून होणारे नुकसान टाळण्यासाठी उरण नगर परिषदेने शहरातील २५ इमारतींना नोटिसा बजावल्या आहेत. यात नागरिकांनी सुरक्षा म्हणून या राहत्या इमारती रिकाम्या कराव्यात अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. वादळी वाऱ्यांमुळे धोकादायक इमारती किंवा त्याचा भाग कोसळून जीवित हानी होऊ नये यासाठी दक्षता म्हणून ही कार्यवाही करण्यात येत आहे.

सतर्कता म्हणून उरण नगर परिषदेच्या माध्यमातून शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याची मोहीम राबविण्यात येत आहे. शहरातील निमुळत्या मार्गामुळे अशा धोकादायक इमारतींकडे जाण्यासाठी मार्ग उपलब्ध नसल्याने मदतकार्य पोहचविण्यास अडथळा निर्माण होतो. त्यामुळे उरण शहरातील धोकादायक इमारती रिकाम्या कराव्यात आशा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. आपत्कालीन काळात या इमारतीच्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी वास्तव्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. मात्र त्यापूर्वी नागरिकांनी घरे रिकामी करावीत, अशी माहिती उरण नगर परिषदेचे नगर अभियंता निखिल दोरे यांनी दिली.