उरण : वादळीवाऱ्यामुळे समुद्रात धोक्याचा इशारा देण्यात आल्याने मागील आठवडाभर मुंबई ते उरणदरम्यानची जलसेवा बंद होती. ती सुरू होत नाही तोच मंगळवारी पुन्हा एकदा वातावरणातील बदलामुळे बंद करण्यात आली आहे.

उरणच्या मोरा ते मुंबईतील भाऊचा धक्का या दोन बंदरांच्या दरम्यान जलसेवा दिली जात असून पावसाळ्यातही ही सेवा सुरू असते. परंतु मागील आठवड्यात हवामान विभागाने वर्तविलेल्या अनुमानानुसार वादळी वारे वाहणार असल्याने समुद्रात धोक्याचा इशारा देणारा तीन नंबरचा बावटा लावण्यात आला होता. त्यामुळे ही जलसेवा बंद करण्यात आली होती. ती शनिवारी पुन्हा एकदा सुरू करण्यात आली. मात्र मंगळवारी हवामानात बदल झाल्याने ही सेवा पुन्हा एकदा बंद करण्यात आली असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली आहे.