वाहतूक कोंडीत भर उरण : जेएनपीटी बंदराशी जोडणाऱ्या ३४८ क्रमांकाच्या राष्ट्रीय महामार्गावर नव्याने बांधण्यात येत असलेल्या आठ पदरी पुलावरील वर्षभरापूर्वी खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम कासवगतीने सुरू आहे. त्यामुळे दररोज जेएनपीटी बंदरात ये-जा करणाऱ्या शेकडो वाहनांच्या लांबच लांब रांगा लागत असून वाहतूकदारांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे. विशेष म्हणजे खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम १५ दिवसांत पूर्ण होईल असे भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरणाचे संचालक प्रशांत फेगडे यांनी सांगितले होते. मात्र वर्षभरानंतरही दुरुस्तीचे काम पूर्ण झालेले नाही. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. मुंबई जेएनपीटी पोर्ट रोड कंपनीकडून जेएनपीटी परिसरात कोरिडॉर, आठ पदरी रस्ते तसेच सात उड्डाणपूल उभारण्यात येत असून ही सर्व कामे ‘एनएचआय’मार्फत सुरू आहेत. बहुतांश कामे मुदतीत झालेली नाहीत. त्यामुळे वारंवार संबंधित कामे पूर्ण करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. तरीही अनेक कामे अद्यापही रखडत रखडत सुरू आहेत. यामध्ये जेएनपीटी बंदराशी जोडणारा एनएचबी-४ या महामार्गावर नव्याने बांधण्यात येणाऱ्या आठपदरी रस्ता व उड्डाणपुलाचाही समावेश आहे. जेएनपीटी बंदराशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाच्या टोकाशी सुरू असलेल्या या आठ पदरी पुलावरील रस्त्यावरील मातीचा भराव ६ जानेवारी २०२१ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अचानक रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यापूर्वीच खचला होता. तसेच एका बाजूच्या सेवा रस्त्यालाही मोठय़ा प्रमाणात तडे गेले होते. त्यामुळे वर्षभरापासून या खचलेल्या सुमारे ५०० मीटर लांबीच्या खचलेल्या रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू आहे. या खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामामुळे मागील वर्षभरापासून उड्डाणपुलावरून वाहतूक बंद करून सव्र्हिस मार्गावरून सुरू करण्यात आली आहे. ती अद्यापही सव्र्हिस रोडवरूनच सुरू आहे. खचलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम १५ दिवसांत पूर्ण होईल असे नॅशनल हायवे इंडिया अॅथॉरिटीचे अध्यक्ष प्रशांत फेगडे यांनी त्या वेळी सांगितले होते. मात्र ठेकेदाराकडून कासवगतीने सुरू असलेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम एक वर्षांच्या कालावधीनंतरही रखडत रखडत सुरू आहे. या रखडत रखडत सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे दररोज जेएनपीटी बंदरातून या रस्त्यावरून वाहतूक करून आयात-निर्यात होणाऱ्या कंटेनर ट्रेलरमुळे वाहतूक कोंडींची समस्या निर्माण होते. दररोज होणाऱ्या वाहतूक कोंडीच्या समस्येंमुळे वाहतूकदारांकडून संताप व्यक्त केला जात आहे. वर्षांपासून कासवगतीने सुरू असलेल्या रस्त्याचे कामाबाबत विचारणा केली असता येत्या १५ दिवसांत दुरुस्तीचे काम पूर्ण होईल. - प्रशांत फेगडे, भारतीय राज्य महामार्ग प्राधिकरणचे संचालक