काय राव चेष्टा करून राहिलात का? अहो, ती हवा तर आपल्याला दिसतही नाही. मग तिला वजन काय असणार! तर तसं नाही. कितीही हलकी असली तरी हवेलाही वजन आहेच. पण खरं तर हा प्रश्न तितकासा बरोबर नाही. हवा तर सगळीकडेच भरून राहिली आहे. मग हवेचं वजन म्हणजे किती हवेचं वजन? तेव्हा आपण हा प्रश्न जरा सुधारून घेऊ या. एक लिटर हवेचं वजन किती, असं विचारू या. खरं तर तेही सांगणं तितकंसं सोपं नाही. कारण हवा सगळीकडे असली तरी ती सारखीच नसते. काही ठिकाणी तिच्यात बाष्प जास्त असतं. काही ठिकाणी प्रदूषणामुळे कार्बन डाय ऑक्साइडचं प्रमाण वधारलेलं असतं. उंचावर गेलात तर हवा विरळच होते. मग परत एकदा प्रश्न सुधारून घेऊ या. समुद्रसपाटीवरच्या आणि प्रदूषणविरहित एक लिटर हवेचं वजन किती? या हवेत २१ टक्के ऑक्सिजन, ७८ टक्के नायट्रोजन, ०.०३ टक्के कार्बन डायऑक्साइड हे वायू मुख्यत्वे असतात. हे समजल्यावरही त्या हवेचं वजन किती हे सांगणं तसं सोपं नाही. घेतली हवा आणि टाकली तराजूच्या पारडय़ात, असं तर करता येत नाही. त्यासाठी मग वेगळीच युक्ती करायला हवी. हवा म्हणजे निरनिराळ्या वायूंचं मिश्रण. म्हणजे तीही वायुरूपच. या वायूंचा एक गुणधर्म आहे. २२.४ लिटर वायूमध्ये ६ ७ १०२३ इतके रेणू असतात. या अगडबंब संख्येला अॅव्होगॅड्रो संख्या असं म्हटलं जातं. इतक्या रेणूंचं वजन त्या पदार्थाच्या अणुभाराइतके ग्रॅम असतं. म्हणजे समजा तो वायू ऑक्सिजन असेल तर तितक्या रेणूंचं वजन ३२ ग्रॅम भरेल आणि तो नायट्रोजन असेल तर २८ ग्रॅम. आता हवेत असलेलं या वायूंचं प्रमाण लक्षात घेतलं तर मग साधं गणित करून आपण २२.४ लिटर हवेचं वजन करू शकू की नाही? तुम्हीच गणित करून पाहा. ते व्यवस्थित केलंत तर उत्तर मिळेल २८.८९ ग्रॅम. आता २२.४ लिटर हवेचं एवढं तर एका लिटरचं किती? साधं त्रराशिक आहे. ते सोडवलं की समजेल की एक लिटर हवेचं वजन १.२९ ग्रॅम आहे. तराजूच्या दांडीलाही हात न लावता मोजलं की नाही ते! - डॉ. बाळ फोंडके मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org महादेवी वर्मा.. कवितेतली आस! महादेवी वर्मा यांनी स्वातंत्र्यपूर्व आणि नंतरचा १९८७ पर्यंतचा भारत पाहिला. देशातील एकूण अंधकारमय स्थिती, दैन्य, विषमता, स्त्रीची दयनीय अवस्था हे सारं दूर करण्याची त्यांची भावना त्यांच्या साहित्यातही दिसते. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांनी ‘दिया’ या शीर्षकाची खडी बोलीतली पहिली कविता लिहिली. १३ व्या वर्षी १०० छंदाची एक करुण कथा खंडकाव्याच्या स्वरूपात लिहिली. ‘चाँद’ मासिकात त्यांच्या सुरुवातीला कविता प्रसिद्ध झाल्या. आणि अखेपर्यंत त्या कविता लेखन करीत होत्या. हिन्दी काव्याचा अभ्यास महादेवींचे नाव वगळून करणं शक्य नाही. वेदना, विरह हा त्यांच्या कवितेचा स्थायीभाव आहे. स्त्रीजीवनात काही विधायक बदल घडायला हवेत तर स्त्रीने आपला आदर आपणच करायला शिकणं गरजेचं आहे. त्यासाठी स्वत्त्वाची जाणीव आणि आत्मविश्वास हवा असं सांगून महादेवी वर्मा भारतीय स्त्रीला संदेश देतात - .. है तुझे अंगार शय्यापर मृदुल कलियाँ बिछाना जाग तुझको दूर जाना!.. मध्ययुगातील मीराबाई आणि आधुनिक काळातील मीरा असलेल्या महादेवी वर्मा यांच्यामध्ये विलक्षण साम्य आहे. विरह - वेदना हा या दोघींच्या काव्याचा स्थायीभाव आहे. दोघींच्याही काव्यातून आस प्रकटते ती त्या परमात्म्याच्या भेटीची! स्वत:ला प्रेयसी आणि भगवंताला प्रियकर मानून, त्या भक्ती करत. या भक्तीला ‘मधुरा भक्ती’ असे म्हणतात. हीच भक्ती मीराबाई आणि ‘आधुनिक मीरा - महादेवी - यांच्यातील समान धागा आहे. कल्पनारम्य छायावादी कवयित्री असं त्यांना मानलं जात असलं तरी त्या इतर छायावादी कवींपेक्षा वेगळ्या आहेत. थोडक्यात सांगायचं तर आदर्श आणि यथार्थ वास्तव यांचा सुरेख मेळ घालणारी अशी ही कवयित्री आहे. हिन्दी साहित्यातील या श्रेष्ठ कवयित्रीला कवी ‘निराला’ यांनी ‘हिन्दी के विशाल मंदिर की सरस्वती’ असं म्हटलं आहे. बालवयापासून काव्यलेखन करणाचा महादेवींच्या सुरुवातीच्या कवितांचा समावेश असलेला काव्यसंग्रह आहे. - ‘निहार’ १९३० मध्ये प्रकाशित झालेल्या या संग्रहातील कविता, त्या आठवीत शिकत असताना लिहिलेल्या कविता आहेत. त्या वाचून प्रकाशक त्यांना शोधत आहे आणि त्या प्रकाशकाने ‘निहार’ हे त्यांच्या कवितांचं पुस्तक प्रसिद्ध केलं. तेव्हापासून त्यांना प्रकाशकांचा शोध कधी घ्यावाच लागला नाही! प्रकाशकांनीच त्यांचा शोध घेतला. - मंगला गोखले mangalagokhale22@gmail.com