‘टाइम अॅण्ड टाइड वेट्स फॉर नो मॅन’, अशी इंग्रजीत एक म्हण आहे. काळ आणि भरतीची लाट कोणासाठीही थांबत नाही या अर्थाची. त्या दोन ‘टी’च्या जोडीला आता तिसरी ‘टी’ बसवायला हवी- टेक्नॉलॉजी! तंत्रज्ञानाचा रेटा माणसाच्या जीवनाची घडी विस्कटूनच टाकतो. कित्येक जणांच्या जगण्याचं साधनच हिसकावून घेतो. ते व्यवसाय मुळापासून उखडूनच टाकतो. हेच बघा ना, उण्यापुऱ्या चाळीस-पन्नास वर्षांपूर्वी गल्लीगल्लीतून घुमणारे ‘कल्हऽऽईऽय्य’ हे आवाज आता ऐकूच येईनासे झाले आहेत. त्या काळी कल्हईवाल्याचा धंदा तेजीत होता. प्रत्येक गृहिणीला नियमितपणे त्याची गरज भासत होती. स्वयंपाकाला पितळेची भांडी, जेवायला पितळेची ताटं, पाणी प्यायला पितळेचेच प्याले, अशा परिस्थितीत त्या भांडय़ांना कल्हई लावणं अपरिहार्यच होतं. पितळ म्हणजे तांबं आणि झिंक यांच्यापासून तयार झालेला मिश्र धातू. भांडी तशी चांगली घासून-पुसून स्वच्छ ठेवली तर सोन्यासारखीच झळाळी देणारी. पण आपल्या अन्नात जी सौम्य अशी सेंद्रिय आम्लं असतात त्यांचा मारा त्या पितळेला, खास करून त्यातल्या तांब्याला, सहन होत नाही. त्यांच्याशी होणाऱ्या विक्रीतून विषारी संयुगांची निर्मिती होते. मग अन्नविषबाधा अटळच. ती टाळण्यासाठी त्या पितळेला संरक्षण देणारं कवच घालण्याची गरज भासे. तीच या कल्हईनं भागवली जाई. त्यासाठी जमिनीत खड्डा खणून पेटवलेल्या भट्टीत ते भांडं तांबडंलाल होईतो धरलं जाई. त्याच्यावर मग नवसागर म्हणजेच अमोनियम क्लोराइड शिंपडलं जाई. आता कथिलाची काडी त्या भांडय़ाच्या पृष्ठभागावर घासली की ताबडतोब वितळून तिचं द्रवात रूपांतर होई. ते होतं ना होतं तो कापसाच्या बोळ्यानं सफाईदारपणे त्याचं लिंपण संपूर्ण पृष्ठभागावर केलं जाई. थंड पाण्यात ते बुडवून ‘चुर्र’ असा आवाज निघाला की पितळेचं भांडं आपलं संरक्षक कवच मिरवत तुमचं अन्न शिजवायला तयार. तसं पाहिलं तर कथिल अगदीच मवाळ वृत्तीचं. सहज वाकणारं, मऊसूत, सहजासहजी वितळणारं. पण त्याचे हे गुणधर्म आम्लापासून त्याला संरक्षण देणारे आणि म्हणून पितळेच्या भांडय़ाला कठोर व्हायला मदत करणारे. ते देता-देता स्वतचा बळी द्यायलाही कथिल तयार. म्हणून तर नियमितपणे नव्यानं कल्हई लावण्याची गरज असे. स्टेनलेस स्टीलचा उदय झाला आणि बिचाऱ्या कथिलाला सगळेच विसरले. गरज सरो आणि वैद्य मरो, दुसरं काय? - डॉ. बाळ फोंडके मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, चुनाभट्टी, मुंबई २२ office@mavipamumbai.org